पहिल्याच वर्षी गणेशाचे शांततेत आगमन
कोरोनापेक्षा पोलिसांच्या कारवाईची भीती
प्रतिनिधी / सातारा
गणेशोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. दहा दिवस घरा-घरात सर्वाचे लाडके बाप्पा विराजमान झाले. मात्र न ढोल, ताशा न गुलालाची उधळण करत शांततेत बाप्पाचे आगमन होणारे हे पहिलेच वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येत आहे.
दरवर्षी सातारा शहरातील गणेशोत्सव लक्षवेधी ठरतो. गणरायाचे आगमन होण्याआधी महिनाभर घरा-घरात ते सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची तयारी सुरू असते. गेल्या चार-पाच वर्षापूर्वी डॉल्बीची पेझ होती. या डॉल्बीच्या आवाजामुळे शहरातील बोले वडापाव विक्रेत्यावर भिंत कोसळून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे डॉल्बी वाजवण्यावर बंदी आली. आणि ढोल, ताशा पथक, झांझ पथकांची मागणी वाढली. गणेश चतुर्थी दिवशी सकाळपासून ही पथके सज्ज असतात. सार्वजानिक मंडळापुढे ढोल, ताशाचा आवाज घुमत असतो. यांच्या प्रत्येक तालावर गुलालाची उधळण करण्यात येते.
चालू वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाची गडद छाया पसरली आहे. गणेश चतुर्थीला गणेशोचे आगमन होते. परंतु शुक्रवारपासून काहीं भक्तांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला. सकाळपासून कुंभारवाडय़ातून गणपती आणताना मंडळाचे फक्त पाच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळण्यात आला. गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देण्यात आल्या. कुठल्याही मंडळाने ढोल, ताशा वाजवले नाहीत, स्वागतासाठी झांझ पथक नव्हते. आगमनावेळी कार्यकर्ते मोठया प्रमाणावर गुलालाची उधळण करतात. रस्ते गुलालाने रंगून जातात. यंदा गुलालाची उधळण झाली नाही. फक्त रस्ते गर्दीने फुलून गेले होते. यंदा पहिल्या वर्षी सर्वत्र गणरायाच्या आगमनावेळी शांतता पसरली होती.
पोलिसांच्या कारवाईची धास्ती
गणेश चुतर्थीला प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करण्यावर कडक करवाईचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करण्यासाठी मंडळाच्यावतीने प्रयत्न सुरू हेते. सोशल डिस्टन्स ठेवत कार्यकर्ते बाप्पाचे स्वागत करत होते. कोरोनापेक्षा पोलीसांच्या कारवाईची भीती सर्वत्र पहायला मिळत होती.