ऑनलाईन टीम / सातारा :
जावली तालुक्यातील मेरुलिंग घाटात इर्टीगा कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. आज सकाळी पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
कारचालक शिवाजी जगन्नाथ साबळे (वय 40), लिलाबाई गणपत साबळे (55), आणि सागर सर्जेराव साबळे (32) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी रेशनिंग आणण्यासाठी इर्टीगा कारमधून 8 प्रवाशी प्रवास करत होते. दरम्यान, मेरुलिंग घाटात एका अवघड वळणावर कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना बाहेर काढले. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, 4 जण जखमी आहेत. त्यांना मेढा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.