सातारा / प्रतिनिधी :
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना मागे घेऊन महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या तत्वांवर आधारित नवे कृषी धोरण राबवण्याची मागणी करणारे आंदोलन श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने महात्मा फुले यांच्या गावी कटगुणला दि.9 रोजी करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकाद्रारे दिली. दरम्यान, दिल्लीच्या भोवती सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा हे आंदोलन आहे, असे ही त्यांनी सांगितले.
पाटणकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिल्ली येथे केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत म्हणून गोठवणाऱ्या थंडीची पर्वा न करता लाखोंच्या संख्येने शेतकरी आंदोलनास बसले आहेत. केवळ भांडवलदार आणि बड्या कंपन्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन हे तिन्ही कायदे कोणतीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर अत्यंत घाईघाईने मंजूर करून घेण्यात आले. वरवर शेतकर्यांचे हित यातून जपले जात असल्याचा दिखावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकर्यांना उध्वस्त करण्याचे हे षडयंत्र आहे.
या कायद्यामुळे होणारी फसवणूक लक्षात आल्याने शेतकरी मोठ्या संख्येने हे कायदे रद्द करावेत यासाठी आंदोलनात उतरले आहेत. खरं तर केंद्र सरकारने केलेल्या 1)शेतकरी [अधिकार व सरंक्षण] करार, किंमत हमी व शेती सेवा कायदा सन २०२०, 2)- शेतकरी शेतमाल व्यापार व विक्री [उत्तेजन व सुविधा] कायदा सन २०२०, 3)-अत्यावश्यक वस्तू [दुरूस्ती] कायदा सन २०२० या कायद्याने शेतकरी आपला माल कुठेही जाऊन विकू शकतो असे भासवून कंपन्या मार्केट समित्यांच्या बाहेर स्वतःचं मार्केट लावू शकतील, त्यामुळे शेतकर्यांना कोणत्याही कराशिवाय आपला माल विकेल व शेतकर्यांना त्याचा फायदा होईल असे संगितले जाते. पण प्रत्यक्षात तसे होणार नाही. आम्ही शनिवार दि. ९ रोजी कटगूण ता. खटाव जि. सातारा या महात्मा फुलेंच्या जन्मगावी ठिय्या आंदोलन करीत आहोत, असेही पाटणकर यांनी सांगितले.