सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहर परिसरात असलेल्या सदर बझार येथे पिसाळलेल्या कुत्र्याने 14 जणांचा चावा घेतल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. सदर बझार येथे घरटी कत्तलखाने सुरू असल्याने जनावरांचे मांस इतरत्र टाकले जाते. हे मांस खाण्यासाठी कुत्र्यांचे टोळके जमा होत असून त्यांच्यात भांडणे होत आहेत. लहान मुलांना भटकी कुत्री लक्ष करत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर बझार बागवान गल्ली, कसाई गल्ली आणि लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी येथील तब्बल 14 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केलं आहे. यामध्ये एक रेडकू देखील जखमी झाले असून, पिसाळलेल्या कुत्र्याने इतर भटक्या कुत्र्यांचा चावा घेतल्याने आणखी कुत्री पिसाळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.. पालिकेने या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांना नवीन संकटांना सामोरे जावे लागणार आहे.