अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला साधूंची उत्तमोत्तम अशी तीस लक्षणे सांगत आहेत. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, आता बारावे लक्षण ऐक. कोणत्याही वस्तूचा संग्रह किंवा स्वीकार करण्याचा विचार साधूच्या मनाला शिवतही नाही. अशी वृत्ती म्हणजेच ‘अपरिग्रहता’ होय. देहाची किंवा घरादाराचीसुद्धा संगति न धरणे याचेच नाव अकिंचनता. साधूही वस्तूंचा संग्रह करणाऱयांमध्ये राहतो, तो संग्रहकर्ता आहे असेही वाटेल परंतु जागृती, स्वप्न, सुषुप्ती, यातील कोणत्याही अवस्थेत तो संग्रहीपणाला स्पर्शही करीत नाही. चैतन्यस्वरूपामध्येच मन जडले, सर्व विश्व चैतन्यानेच भरलेले आहे असे वाटू लागले, परिग्रहाची आठवण नाहीशी झाली की, त्या स्थितीलाच आकिंचनपणा असे नाव आहे. आता ‘अनीहेबद्दल सांगतो ऐक. ईहा म्हणजे इच्छा आणि अनीहा म्हणजे निरिच्छता. सर्वांना इच्छांनी वेढलेले असल्याने निरिच्छता दीन झाली होती. ती ज्याच्याकडे जाई तो तिला दूर घालवून देत असे. संत मूळचेच कृपाळू असल्यामुळे त्यांना तिची दया येऊन आपल्या हातांनी तिचे डोळे पुसले आणि आपल्या हिताकरिता तिचा प्रतिपाळ केला. अशा रीतीने ती संतांच्या बळावर वाढली आणि पूर्वीचे वैर मनांत आणून ईहेचा (म्हणजे इच्छेचा) सूड उगविण्यासाठी संतांना त्याबद्दल उपाय विचारून कामाला लागली. अहं आणि ममता ह्या ईहेच्या म्हणजे इच्छेच्या मैत्रिणी. त्यांनी ईहेला अनेक प्रकारच्या खेळांनी खेळवले आणि शेवटी तिला कामाने आपल्या स्वाधीन करून घेतले. कामाचा पाठिंबा मिळताच इच्छा फारच प्रबळ झाली आणि ती घरोघर व्यापून राहिली. तेव्हा तिचा सूड उगविण्यासाठी निरिच्छा सपाटय़ाने निघाली. तिने संतांपासून असंगपणाचे म्हणजे सर्वसंगपरित्यागाचे शस्त्र मागून घेतले आणि इच्छेचा घात करण्यासाठी ती आधी ‘अहं’ आणि ‘ममता’ ह्या दोघांना मारावयास धावून गेली. तेव्हा ती दोघे भयाने जेथल्या तेथेच ठार झाली. ती दोघे लटलटा कापू लागली आणि घाव न लागताही, त्यांनी तेथल्या तेथेच प्राण टाकला. अनीहेला (म्हणजे निरिच्छेला) डोळय़ांनी पाहताच काम हा बारा वाटांनी पळत सुटला. त्याला संकल्पाच्या शेवटच्या गोटामध्ये हा हा म्हणता ठार केला. अशा प्रकारे काम हा रणांगणामध्ये पडताच क्रोधादिक शूर वीर होते तेही धारातीर्थी पतन पावले. अखेर इच्छेचा पाठीराखा कोणीच उरला नाही. कारण, एकेकाला शोधशोधून मारून टाकले. एकूण निरिच्छेच्या समोर उभा राहील असा कोणी वीरच शिल्लक राहिला नाही. तिने सर्वांना मारून अगदी चक्काचूर करून टाकला. म्हणून इच्छेच्या संगतीला जो लागला, तो अधोगतीला गेला म्हणून समजावे आणि जो निरिच्छेचा अंकित झाला, तो गोविंदालाही प्रिय झाला म्हणून समजावे. उद्धवाला निरच्छतेचं महत्त्व समजलं म्हणून त्यानं भगवंतांना विचारलं की, ‘अनीहा’ (म्हणजे निरिच्छता) आणि ‘ईहे’ चे (म्हणजे इच्छेचे) लक्षण कोणते ? भगवंत म्हणाले काम्य कर्मे माणसाला मोठी भुरळ घालून त्याला त्यांच्या जाळय़ात ओढतात त्या जाळय़ात फसण्याची माणसाला होणारी इच्छा तीच अत्यंत चपळ अशी ‘ईहा’ म्हणून समजावी आणि ज्या अंतःकरणांत इच्छेचा गंधही उद्?भवत नाही किंवा कर्माची कर्मावस्थाही उत्पन्न होत नाही, तीच खरोखर ‘अनीहा’ (म्हणजे निरिच्छता) होय. अशी निरिच्छता ज्याला प्राप्त होते, त्याचा देवही आज्ञाधारक होऊन राहतो. तीच निरिच्छता रात्रंदिवस जिवाभावाने संतांची दासी होऊन राहते. ही ‘अनीहा’ (म्हणजे निरिच्छता) अत्यंत गौरवाने साधूंचे तेरावे लक्षण होऊन राहिली आहे. आता चौदावे लक्षण ‘मितभोजन’, तेही त्याच्या थोरवीसहवर्तमान श्रवण कर. मितहारी जिव्हेच्या इच्छेला बांधला जात नाही, क्षुधेच्या तावडीत कधी सापडत नाही आणि आवडीनिवडीच्या भरीस न पडता तो भोजनाला तयार असतो. जठराग्नि अन्नाला भक्षण करतो, त्या दोघांना मी साक्षीदार आहे हे जाणून तो साऱया रसांचे सेवन करतो. जे काय भोजनाला येईल, त्याचे दोष दृष्टीनेच नाहीसे करतो आणि त्याला अत्यंत पवित्र करून आत्मैक्मयानेच त्याचे सेवन करतो.