‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी !’ प्रत्येकाच्या मनातला गोवा हा असाच आहे. गोमंतकीय जगात कुठेही गेलेला असो, त्याला स्वर्गाहुनी श्रेष्ठ असा गोवाच वाटावा. या भूमीतच अशी जादू आहे. आज गोवा मुक्तीदिन. 60 वर्षांपूर्वी आजच्या रात्रीला पोर्तुगीजांनी भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ‘विजय’समोर शरणागती पत्करलेली. भारतीय स्वातंत्र्यानंतर 14 वर्षांचा विलंब लागला गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळवण्यासाठी. तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांनी गोव्यात लष्कराला पाचारण केले व संपूर्ण गोवा लष्काराने ताब्यात घेतला. पोर्तुगीज पाखल्यांना या देशातून हटविले. गेवा या छोटय़ाशा संघप्रदेशावर आजपर्यंत अनेकांनी राज्य केले. मौर्य व सातवाहन यांनीही गोव्यावर एकेकाळी राज्य चालविले होते. त्यानंतर विजयनगरचा राजा कदंबने राज्य चालविले. पुढे बिजापूरच्या हसन गंगु बहामनी या सुलतानाने राज्य चालविले. आदिलशहा राजवटीत पोर्तुगालची व्यापारी मंडळी कालिकतहून गोव्यात बंदरावर पोहोचली. तेच आजचे वास्को-द-गामा बंदर. पोर्तुगीजांनी इथे गोमंतकीय जनतेच्या साधेपणाचा लाभ उठवित इथे राज्य चालविले व नंतर बाटाबाटी धर्मांतराद्वारे आपले पाय अधिक मजबूत केले. पोर्तुगीजांनी आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टी प्रामुख्याने इथे आणल्या व त्या माध्यमातून धर्माचा प्रचार व प्रसार केला. गोव्याला फार मोठा इतिहास आहे. या गोमंतभूमीची निर्मितीच मुळी परशुरामाने अरबी समुद्राच्या काठी राहून सोडलेल्या एका बाणामुळे झाली व जिथून त्यांनी बाण सोडला त्या परिसराला बाणावली हे नाव पडले. पोर्तुगीजांनी 450 वर्षांच्या राजवटीत सर्वांसाठी समान नागरी कायदा तयार करून ठेवला. गोवा मुक्तीनंतरही आजपर्यंत हा कायदा तसाच राहिला. पोर्तुगीजकालीन काही कायदे गोव्याला जे लागू राहिले त्यापैकी हा एक आहे. गोमंतभूमीला 800 पेक्षाही अधिक वर्षांचा इतिहास आहे. आणि 1961 पासून इतिहासाच्या नव्या अध्यायाला प्रारंभ झाला. जनतेला न्याय्य हक्क प्राप्त करून देण्यासाठी 61 नंतर राज्यात आलेल्या सर्वच सरकारांनी व प्रशासकांनी प्रयत्न जरूर केले. भारतीय लोकशाही परंपरेच्या पंक्तीमध्ये गोवा येऊन बसला. गोव्यात लोकशाही नांदण्यासाठी, जनतेला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी शेकडो विरांनी गोमंतभूमीवर रक्त सांडले. शूरवीरांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. पोर्तुगीजांविरुद्ध गोव्यात अनेक बंडे झाली. एक मोठे बंड खुद्द ख्रिस्ती नागरिकांनीच सुरू करण्याचे ठरविले. परंतु एका धर्मगुरुने ते उघड केले आणि बंड न होता देखील ज्यांनी बंडाचा प्रयत्न केला त्या सर्वांना पणजीत आदिलशाहीवाडय़ाच्या मागे भर रस्त्यावर फाशी देऊन ठार मारले होते. गोवा मुक्तीचा लढा फार मोठा, अंगावर शहारे येतील अशा प्रत्यक्ष घडलेल्या या कथा आहेत. बाळा राया मापारीविरुद्ध कट रचून पोर्तुगीजांनी त्यांना हाल हाल करून मारले. जनतेमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करणारे आणि त्याचबरोबर साक्षर आणि सुसंस्कृत करून सोडणाऱया हिरवे गुरुजींना तेरेखोल येथे गोळी घालून ठार मारण्यात आले. गोव्यातील जनतेमध्ये डॉ. राममनोहर लोहिया यांनी क्रांतीची बिजे पेरली. शेकडो युवक त्याकाळी त्यांच्या भाषणाने व कार्यपद्धतीने प्रेरित होऊन पोर्तुगीजांशी दोन हात करण्यास राजी झाले. क्रांतीवीर मोहन रानडे, आज हयात असलेले त्या काळचे क्रांतिकारक प्रभाकर सिनारी, दत्तात्रय देशपांडे, विश्वनाथ लवंदे, मनोहर आपटे यासारख्या क्रांतीकारकांनी फार मोठे योगदान दिले आहे. डॉ. टी. बी. कुन्हा, डॉ. ज्युलियो मिनेझीस, दत्तात्रय देशपांडे इत्यादींना अनेक वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. गोमंतकाचा मुक्तीलढा गोव्यापुरताच मर्यादित नव्हता तर महाराष्ट्रातून क्रांतीकारकांनी गोवा मुक्तीलढय़ात भाग घेतला. ना. ग. गोरे, प्रख्यात गायक सुधीर फडके, एस. एम. जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, मधू दंडवते, शिरू भाऊ लिमये इत्यादींच्या सहभागाने 1955 मध्ये गोव्यात येण्यास तुकडय़ा निघाल्या आणि गोवा मुक्तीसाठीचा आवाज बुलंद झाला. अर्थात या सर्वांना नंतर पोर्तुगीजांनी अटक केली. हिरवे गुरुजींसह सुमारे आठजणांनी वीरमरण पत्करले. त्यात महिलाही होत्या. तेरेखोल येथील तो काळाकुट्ट दिवस होता आणि इथे अनेक थोर गोमंतपुत्रांना आग्वाद तुरुंगात डांबले गेले. गोव्याचा समग्र इतिहास हा आजच्या युवापिढीसमोर येणे आवश्यक आहे. संत तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली । ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या’! गोमंतकाला देशातील इतर राज्यांच्या तुलनेत फार त्रास सहन करावे लागले नाही. या प्रदेशावर निसर्गाने आपला वरदहस्त ठेवलेला आहे. सुजलाम सुफलाम असाच हा प्रदेश आहे. अनेक संकटांतून वाचलेला हा प्रदेश आहे. मात्र 450 वर्षांत अनेकांनी अत्याचार सहन केले. अनन्वीत छळास गोमंतकीय जनता सामोरी गेली. गोवा तावून सुलाखून बाहेर पडला म्हणून आज काही प्रमाणात का असेना शेजारील राज्यांच्या तुलनेत 5 टक्के जादा सुख भोगतोय. परंतु, 450 वर्षांचा छळ या राज्याने यापूर्वी सहन केलेला विसरता येणार नाही. आज 21 व्या शतकात गोवा मुक्तीचा हिरक महोत्सव साजरा करताना आपल्याला या धरित्रीवर रक्त सांडणाऱया परकी शक्तींविरोधात प्राणाची बाजी लावणाऱया गोव्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱया शूरवीर स्वातंत्र्यवीरांना विसरता येणार नाही. त्यांनी गोव्यासाठी दिलेले बलिदान म्हणून आज आपण चार घास आनंदाने खाऊ शकतो. गेल्या 60 वर्षांच्या कालावधीत गोव्याने, गोमंतकीय जनतेने विकासाची गंगा अनुभवली. गोव्याने अनेक राजकीय कलह, राजकीय स्थित्यंतरेही अनुभवली. गोव्याने आपसात विद्वेश पसरविणारी भाषिक आंदोलनेदेखील अनुभवली. गोवा आज अत्याधुनिक विकासाच्या उंबरठय़ावर उभा आहे. विकासाबरोबरच पर्यावरण भकास होऊ नये यासाठी सत्तेवर आलेल्या सरकारांनी विशेष दखल घेतलेली नाही. परंतु जनता जागृत आहे. त्यामुळे सरकारचेही जनतेपुढे शहाणपण चालत नाही. लोकशाही प्रक्रियेत सर्वांनाच अधिकार असला तरी प्रगल्भता असलेली माणसे वाकडे पाऊल टाकणार नाहीत. गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त आपण आज हिरक महोत्सवाला कोविड महामारीच्या काळात प्रारंभ करतोय. कोविडने संपूर्ण जगाबरोबरच गोव्यातही हैदोस माजविला. आतापर्यंत गेल्या सहा महिन्यातं गोव्याने सुमारे 730 माणसे गमावली. आजवर एवढा धुमाकुळ गोव्यात कधीही झाला नाही. या राज्याला जसे निसर्गाने सढळ हस्ताने दिले तद्वत धन्वंतरीनेही भरपूर आयुष्यही दिले. या धन्वंतरीची कृपा आपणा सर्वांवर सातत्याने राहो. गोवा राज्य आकाराने छोटे असेल मात्र कीर्तीने मोठे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या राज्याची ख्याती पसरलेली आहे. 60 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासातून गोवा आता मुक्तीनंतरच्या 61 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गोवा हा विविध खनिज मालासाठी खाणींची भूमी म्हणून जसा कीर्तीमान आहे तसाच कलाकारांची खाण म्हणूनही संपूर्ण देशभरात ओळखला जातो. लता मंगेशकर, त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर, मा. दत्ताराम, मोगुबाई कुर्डीकर, खाप्रुमाम पर्वतकर, प्रभाकर कारेकर, पं. रामदास कामत, किशोरी आमोणकर, प्रभाकर पणशीकर अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहता हे कलाकार म्हणजे निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या पायथ्याशी निर्माण झालेली ही हिरे माणकेच ठरावीत. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनील काकोडकर यासारखी प्रख्यात शास्त्रज्ञमंडळी अशा या दिग्गजांनी गोमंतकाचे नाव आसमंतात सर्वत्र प्रख्यात केले. गोवा मुक्तीनंतर विकासाची द्वारे खुली झाली आणि असंख्य कलांना प्रोत्साहन मिळाले. सामाजिक जाणीव जनतेत निर्माण झाली. व्यवसाय वृद्धिंगत होत गेला.
गोव्यावर 450 वर्षांमध्ये पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण होऊनदेखील जनता बिघडली नाही. आपल्या मूळ संस्कृतीचे तिने प्राणपणाने जतन केले. गोमंतकीय नागरिक आपल्या परंपरेशी बांधील राहिला. या गोमंतकाने थोर कलाकार दिले. पं. जितेंद्र अभिषेकी दिले. अख्खा देश या कलाकारांवर फिदा झाला. कवीवर्य बा. भ. बोरकर दिले. ज्यांनी ‘निळय़ा खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव’ त्याचबरोबर ‘जेथे होईल माध्यान्ह तेथे पान वाढलेले, काळोखात कुणीतरी ज्योत घेऊन आलेले’ यातून गोमंतकीयांच्या आदरातिथ्यांवर त्यांनी सहज प्रकाश टाकला. ‘स्मरुनी गोमंत देवी’ हे दा. अ. कारे या प्रख्यात कवीने गोमंतभूमीला गोमंतदेवी संबोधले आहे. अलिकडच्या काळात होऊन गेलेला प्रख्यात विद्वान कवी विष्णू वाघ अशा अनेक सरस्वतीपुत्रांनी गोव्याच्या साहित्य परंपरेला देशात सर्वत्र मानाचा मुजरा मिळविला. गोवा आज कुठेही कमी नाही. 1961 पासून तो एका राष्ट्रीय मार्गाने पुढे मार्गक्रमण करीत राहिला. भाऊसाहेब बांदोडकरांपासून येथील मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या विकासात फार मोठे योगदान दिले. त्यातल्या त्यात प्रतापसिंह राणे आणि अकाली निधन पावलेले स्व. मनोहर पर्रीकर या दोघांनी आधुनिक गोमंतकाचा पाया रचला. विकासाची परंपरा आजतागायत चालू आहे व भविष्यातही मार्गक्रमण करीत राहील. आज गोवा मुक्तीदिन 60 व्या वर्षात पदार्पण करतोय. हिरक महोत्सव सुरु होतोय. आता सर्वांमध्ये प्रगल्भता आहेच ती अधिक वृद्धिंगत व्हावी. गोवा मुक्तीलढय़ासाठी अनेकांनी सर्वस्वाचा त्याग केलेला होता ही भावना सर्वांमध्ये सातत्याने जागृत रहावी. या गोमंतभूमीला आपल्या हृदयाच्या सिंहासनावर नेहमीच नेऊन ठेवावे. त्याचबरोबर या भूमीपोटी सदाच कृतज्ञता असावी एवढीच अपेक्षा आहे. जगात कुठेही गेला असाल एकच लक्षात ठेवावे, सारे जहाँ से अच्छा ! यह गोवा है हमारा ! आपला आधुनिक गोवा 60 वर्षांचा झाला. त्याला आता अधिक सांभाळणे ही सर्वांचीच जबाबदारी नाही का? त्यासाठी आपण कर्तव्यतत्पर होऊया !