निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना दिलासा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
निसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिह्यात नुकसान झाले आहे. या
नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 कोटी रुपये निधी जाहीर केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या जिह्यांचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. सिंधुदुर्गचा आढावा पालकमंत्री सामंत यांनी सादर केला. यावेळी आमदार वैभव नाईक, जि. प. अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, सिंधुदुर्गात निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. त्याच्या पंचनाम्यांचे काम सुरू असून नुकसानग्रस्त कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. राज्य शासनाकडून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गची अस्मिता असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी अधिकचा निधीही शासनाकडून उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.
किनारपट्टी भागात अंडरग्राऊंड वीजवाहिन्या
सामंत पुढे म्हणाले, चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात नेहमीच अधिक हानीला सामोरे जावे लागते. यामध्ये विशेषत: विजेचे खांब पडतात. त्यामुळे वाहिन्या तुटतात. यावर उपाययोजना म्हणून किनारपट्टी भागात वीजपुरवठा करण्यासाठी अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी खासदार निधीतूनही पैसे उपलब्ध होणार आहेत. तसेच जिल्हय़ात शासकीय यंत्रणेतील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी चक्राकार पध्दतीने शासनाकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.