नद्यांना पूर : जनजीवन पूर्णतः विस्कळित : पडझडीच्याही घटना
प्रतिनिधी / ओरोस:
गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची अविरत मुसळधार शनिवारीही कायम राहिली. बहुतांश ठिकाणी पूरस्थिती होती. सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. धरणांमधील पाणीसाठाही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले हेते. अनेक ठिकाणची भातशेती पाण्याखाली गेली होती. नुकत्याच करण्यात आलेल्या भात लावणीत मूळं धरण्यापूर्वीच पाणी साचून राहिल्यास त्या ठिकाणची शेती कुजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देवगड तालुक्यात वादळी पाऊस झाला.
दोन दिवस कोसळणाऱया पावसात मळगाव चाफेखोल मार्गे कुणकवळे मार्गावरील मोरीला भगदाड पडून रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. मळेवाड येथील अनिता नाईक यांच्या मांगरावर माड पडून 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. आचरा-कणकवली रस्त्यावर झाड पडून विद्युत वाहिन्या तुटल्या. मालवण तालुक्यातील गुरुनाथ तारी यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून 3800 रुपयांचे नुकसान, तर कुडाळ येथे सरकारी दवाखान्याच्या मागील एका घरावर झाड पडल्याने नुकसान झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे झाली आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासातील आकडेवारीनुसार जिल्हय़ात 106.80 मि. मी. च्या सरासरीने 854.40 मि. मी. पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आजपर्यंत 1442.40 मि. मी. च्या सरासरीने 11539.20 मि. मी. पाऊस झाल्याची नोंद आहे.
तालुकानिहाय पाऊस
शनिवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्हय़ात तालुकानिहाय पडलेला व एकूण पाऊस पुढीलप्रमाणे आहे. दोडामार्ग 69 मि. मी. (एकूण 1998 मि. मी.), सावंतवाडी 104 मि. मी. (1493 मि. मी.), वेंगुर्ले 145.40 मि. मी. (1571.20 मि. मी.), कुडाळ 110 मि. मी. (1323 मि. मी.), मालवण 193 मि. मी. (1935 मि. मी.), कणकवली 66 मि. मी. (1277 मि. मी.), देवगड 100 मि. मी. (1298 मि. मी.), वैभववाडी 67 मि. मी. (1344 मि. मी.). (बॉक्स)
करुळ, भुईबावडा घाटात किरकोळ पडझड
वैभववाडी : तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसाने तिरवडे तर्फ खारेपाटण येथील ग्रामपंचायतीची संरक्षण भिंत कोसळली आहे. एक गोठा कोसळून मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील भुईबावडा व करुळ घाटात किरकोळ पडझड सुरू असली, तरी करुळ घाटातून वाहतूक सुरू आहे. भुईबावडा घाट लॉकडाऊनमुळे पोलीस प्रशासनाने बंद ठेवला आहे. रात्रभर पडणाऱया मुसळधार पावसाने ग्रामपंचायत तिरवडेची संरक्षण भिंत कोसळून नुकसान झाले आहे. येथील शशिकांत शिवराम वळंजू यांच्या मालकीचा गोठा कोसळून नुकसान झाले आहे.