ओटवणे / प्रतिनिधी:
पनवेल खारघर येथीलसिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मंडळाच्या ‘एक हात मदतीचा, आमच्या कर्तव्याचा आणि परिस्थिती सावरण्याचा!” या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे आणि इन्सुली गावांमधील ३५ पूरग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन नाईक ( साळशी देवगड), सहसचिव सचिन सावंत ( देवसु सावंतवाडी), सहखजिनदार अशोक कोळसुलकर (खारेपाटण), कार्यकारिणी सदस्य मंगेश कुवेसकर ( फणसे देवगड) उपस्थित होते.या मंडळाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने यापूर्वीही अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या ओटवणे व इन्सुली गावातील पूरग्रस्तांना गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळावा यासाठी या मंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या दोन्ही गावातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यासाठीओटवणे सरपंच सौ उत्कर्षा उमेश गावकर व सामजिक कार्यकर्ते उमेश गावकर तसेच इन्सुलीचे सामाजिक कार्यकर्ते रुपेश राणे, पत्रकार मयुर चराठकर, बाबा चराठकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी पुरग्रस्तांनी या मंडळाचे आभार मानले.