वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या कक्षेत येण्यासाठी अनेक अफगाणी आणि रोहिंग्या मुस्लिमांनी आता ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे वास्तव समोर आले आहे. भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याचा मार्ग सोपा करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. केंद्रीय यंत्रणांनी सरकारला यासंबंधी माहिती दिली आहे. अफगाणिस्तानच्या किमान 25 मुस्लिमांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे केंद्रीय यंत्रणांना चौकशीत आढळून आले आहे.
संसदेत मागील वर्षी नागरिकत्व सुधारणा कायदा संमत झाला होता. यानुसार अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीयांना भारतीय नागरिकत्व मिळू शकते. या विधेयकापूर्वी कुठल्याही व्यक्तीला भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी किमान 11 वर्षांचे वास्तव्य अनिवार्य होते. सीएए लागू झाल्यावर भारतात राहणारे अफगाणिस्तानचे अनेक मुस्लीम आता ख्रिश्चन धर्म स्वीकारू पाहत असल्याची माहिती दक्षिण दिल्लीच्या अफगाण चर्चमध्ये जाणारे आबिद अहमद मॅक्सवेल यांनी दिली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार सुमारे 1.50 ते 1.60 लाख अफगाणी मुस्लीम दिल्लीच्या विविध भागांमध्ये राहत आहेत. याच समुदायाने अफगाणी शीख नागरिक निदान सिंग सचदेव यांना पक्तिका प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त करविण्यास मोलाची मदत केली होती. सुमारे 40 हजार रोहिंग्या मुस्लीम भारतात राहत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये रोहिंग्यांची संख्या तुलनेत अधिक आहे. मोठय़ा प्रमाणावर रोहिंग्या मुस्लीम 2012 पासून देशात राहत असून आता ते स्वतःला बांगलादेशी ठरवून ख्रिश्चन धर्मही स्वीकारू लागल्याचे अधिकाऱयांचे सांगणे आहे.
मागील 6 वर्षांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सुमारे 4 हजार लोकांना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. 2014 च्या सीमा करारांतर्गत भारत-बांगलादेश यांच्यात भूभागांची अदलाबदल झाली होती आणि सुमारे 14,864 बांगलादेशींना भारताचे नागरिकत्व देण्यात आले होते.