नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीबीएसई अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने शुक्रवारी बारावीचा निकाल घोषित केला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करण्यात आला आहे. यंदा तब्बल 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. तसेच एकंदर निकालाने यंदा विक्रमी मजल गाठली आहे. सीबीएसई बोर्डाने हय़ावेळी बारावीचे निकाल जारी करण्यासाठी 30ः30ः40 या सूत्राचा वापर केला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालांसाठी सूत्र निश्चितीसाठी 13 सदस्यांची समिती नेमली होती. त्यांनीच या मार्किंग पद्धतीची शिफारस केली होती. त्यानुसार बारावीचे निकाल लावण्यासाठी दहावीतील 30 टक्के, अकरावीतील 30 टक्के आणि त्यानंतर बारावीला अंतर्गत, प्रथम सत्र आणि प्रॅक्टिकलमध्ये मिळालेल्या गुणांचा 40 टक्के विचार करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना यावषी देखील डिजिलॉकरच्या माध्यमातूनही मार्कशीट उपलब्ध करून दिले जाणार आहे.