प्रतिनिधी / सातारा :
काल, आज आणि उद्या आपल्याला नतमस्तक व्हायचे असेल तर एकतर देवापुढे नाहीतर सैनिकापुढे व्हावे लागेल. आज सैनिक आहेत म्हणून हा देश आहे. आज अनेक वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान करीत असताना त्यांना आयुष्यात कोणत्या दुःखाला सामोरे जावे लागत असेल याची कल्पना करु शकत नाही. त्यांचा हा त्याग, त्यागाची कोणतीही किंमत होऊ शकत नाही. सीमेवर सैनिक आहेत, म्हणून देशवासीय सुरक्षित आहेत, असे गौरवोद्गार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी काढले.
1971 भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने या युद्धामध्ये सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनच्या पुढाकाराने येथील सैनिक स्कुलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत होते. पोलीस अधिकारी सजन हंकारे, महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे सातारा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, कमांडर राजेंद्र शिवणकर, समाधान निकम, विजय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील युवकांना सैन्यदलात सेवा करण्याची संधी कशी मिळेल, या दृष्टीनेही विचार केला जाईल. माजी सैनिकांच्या जिल्हास्तरीय अथवा राज्यस्तरीय काही मागण्या असतील आणि त्यासाठी माझी काही मदत लागणार असेल तर ती मदत करण्यात मी कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही यावेळी उदयनराजे भोसले यांनी दिली.
सुधीर सावंत म्हणाले, 1971 च्या लढाईत 10 हजार वर्षातील इतिहासातील मोठा विजय भारताने प्राप्त केला. स्वतंत्र भारतातील सर्वात मोठे युद्ध म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले. या युद्धाबाबत गावागावात शाळेत तरुण-तरुणींना माहिती देणे गरजेचे आहे. आज दुर्दैवाने या युद्धाविषयी अनेकांना माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून या युद्धाविषयी राज्यभर जनजागरण मोहीम हाती घेतली जाईल. प्रत्येक तालुक्यात मिल्ट्री कॅन्टीन स्थापन केले जावे यासाठी आपण आग्रही असून त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.