आयुष्यभर आपण एखाद्या सुखासाठी धडपडत असतो, पण ते मिळाल्यावर, अरे यात तर काही विशेष सुख नाही, कशाला आपण या गोष्टीसाठी इतका अट्टहास केला होता? हा असा अनुभव आपल्याला बरेचदा आला असेल. शिक्षण, पैसा, सुंदर बायको/मैत्रीण, शरीरयष्टी सलमान खानसारखी या पैकी कशामध्ये सुख आहे, असे तुम्हाला वाटते? विचार करा- वरची कुठलीही एक गोष्ट तुम्हाला सुखी ठेऊ शकेल? मानवी स्वभावानुसार या सगळय़ा गोष्टी एकत्र मिळाल्या तरच तुम्ही आनंदात राहू शकाल? सुखी म्हणत नाही मी, किंवा समाधानी पण नाही, सुख म्हणजे नेमकं काय? पैसा??
ज्याला सगळं काही अगदी घरबसल्या आयतं मिळतं तो किती सुखी आहे, असं नेहमीच वाटत असतं. आयुष्यात आपण सगळय़ांकडून काही ना काही तरी अपेक्षा करत असतो. ही माझी बायको, तिने असे असे वागले पाहिजे, ही माझी मुलगी तिने असे असे वागले पाहिजे. असे काही ठोकताळे आपल्या मनात तयार असतात. आपण स्वतःला रिंगमास्टरच्या भूमिकेत ठेवतो आणि सगळय़ांनी कसे वागावे, ह्याचे मनातल्या मनात आराखडे बांधत असतो. आपल्या अपेक्षेपेक्षा कोणी वेगळं वागला, की आपली चिडचिड होते. अपेक्षापूर्ती हीच खरे सुख देते, अपेक्षा किती होती, आणि किती मिळालं यावर खरं सुख अवलंबून असते का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की जर तुमचा रिव्ह्यु झाला आणि तुमची अपेक्षा आहे की मला साधारण वीस टक्के पगारवाढ मिळावी, तुम्हाला मिळते 18 टक्के, आणि मग दोन टक्के अपेक्षेपेक्षा कमी, की तुम्हाला सुख मिळणार नाही.
कुठलीही गोष्ट करताना आधी जर समस्या काय येतील याचा विचार केला, तर आधी पासूनच त्यावर काय उपाय करायचा, हे ठरवता येऊ शकते, जेंव्हा एखादा प्रॉब्लेम येतो, तेंव्हा तुम्ही तो आला तर काय करायचं याचा विचार आधीच केलेला असतो, त्यामुळे तुमची अपेक्षा आणि प्राप्तीमधलं अंतर नक्कीच कमी होऊन, नंतर होणारा मानसिक त्रास वाचतो.सेल्फ एस्टीम नावाचा एक प्रकार आहे, की जिला कधीही कोणाच्याही वागण्याने धक्का बसू शकतो. आपण जर सेल्फ एस्टीमचा बाऊ केला नाही तर त्या कारणाने दु:खी होण्याचे काहीच कारण शिल्लक राहू शकत नाही. शेवटी स्वर्गाचा नरक आणि नरकाचा स्वर्ग बनवण्याची क्षमता आपल्या मनात असते.
तुमच्या मनाला सुख ओळखता आलं पाहिजे, एखाद्या काटेरी जंगलातून जाणाऱया पाउल वाटेने जाताना, ती वाट आहे यात सुख मानायचे की आजूबाजूला किती काटे आहेत याचे दु:ख करायचे? असे अनेक प्रश्न आहेत, की ज्यांची उत्तरं आपणच शोधायची आहेत आणि ठरवायची आहेत. सुख हे आयुष्यात बरेचदा निरनिराळय़ा वेषात येते. तुम्ही आपली एखाद्या खास वेषात ते येईल म्हणून वाट पहात असता, पण ते नाठाळ सुख तुमच्या पुढे कधी कुठल्या वेषात येईल, ते सांगता येत नाही. तुम्हाला फक्त त्या सुखाला ओळखता आलं पाहिजे, नाही तर ते तुमच्या दारात कुठल्या तरी वेषात येईल आणि तुम्ही त्याला न ओळखता दार बंद करून घ्याल. कदाचित ते दु:खाचा झगा पण घालून येईल- तुम्हाला त्याला फक्त
ओळखता आलं पाहिजे.