मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना रोहित शर्माच्या दुखापतीचे नेमके स्वरुप काय आहे, याची कल्पना नाही, असे होऊच शकत नाही. सध्या जो चालला आहे, तो सर्व निव्वळ दिखावा आहे, अशी खरमरीत टीका वीरेंद्र सेहवागने केली आहे. रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी भारतीय संघातून वगळले गेले, त्यानंतरही सेहवागने कडाडून टीका केली होती. तोच पवित्रा त्याने येथेही कायम ठेवला.
रवी शास्त्री यांनी आपण निवड समितीचा भाग नाही व त्याला वगळण्याचा निर्णय माझा नाही, असे मागील आठवडय़ात म्हटले. बीसीसीआय वैद्यकीय पथकाने रोहितची दुखापत चिघळू शकते, असे आपल्या अहवालात नमूद केले असल्याचे ते म्हणाले. पण, रोहितची सद्यस्थिती कशी आहे, याबद्दल शास्त्रींना काहीही कल्पना नसेल, हे शक्य नाही, असा सेहवागचा दावा आहे.
‘रवी शास्त्री निवड समितीत समाविष्ट नाहीत. पण, तरीही निवड समितीने मुख्य प्रशिक्षक या नात्याने त्यांच्याशी संवाद साधला असेलच आणि शास्त्री यांचे मतही आजमावले असेल. जरी एखाद्या प्रसंगी हे अनधिकृत असेल तरी कर्णधार व प्रशिक्षक हे निवड समितीशी याबाबत निश्चितच बोलले असतील आणि ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी संघात कोण असावे, कोण नसावे, याबद्दल त्यांनी आपली मते निवड समितीकडे नोंदवली असतीलच’, असे सेहवाग म्हणाला.
‘रोहित तंदुरुस्त नाही, असे निवडकर्त्यांचा कयास असेल तर त्यांनी रोहितला फक्त संघात ठेवून एक पर्यायी खेळाडू तयार ठेवणे आवश्यक होते. पण, जो निर्णय झाला, तो निव्वळ धक्कादायक आहे. आता रोहित सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळला आहे आणि प्ले-ऑफमध्येही खेळत राहणार आहे. तो स्वतः म्हणतो आहे की आपण तंदुरुस्त आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्याला का निवडत नाही, असा सवाल सेहवागने येथे उपस्थित केला.