देशभरात 75 रेल्वे स्थानकांवर प्रकल्प : 51 हजार हेक्टरवर लवकरच प्रकल्प
वृत्तसंस्था/ मुंबई
पश्चिम रेल्वेने आपल्या विविध रेल्वे स्थानकांवर सोलार ऊर्जेचा वापर केला असून याअंतर्गत तीन कोटी रुपयांची विजेची बचत करण्यात रेल्वेला यश आले आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे सरकारी यंत्रणेवरचा विजेचा ताण काहीअंशी कमी होण्यास याने मदत मिळाली आहे.
रेल्वेच्या 75 रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. या सोलार प्रकल्पांतर्गत 8.67 मेगावॅट इतकी ऊर्जा तयार केली जात आहे. त्यामुळे सरकारी विजेच्या वापरामध्ये मोठय़ा प्रमाणात बचत होताना दिसते आहे. मुंबईच्या 22, रतलामच्या 34, राजकोटच्या 8 आणि बडोदाच्या 6 रेल्वेस्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला आहे. अहमदाबाद आणि भावनगर या रेल्वे स्थानकांवरही सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येत आहे. चर्चगेट, मुंबई सेंट्रल टर्मिनस, दादर टर्मिनस, बांद्रा टर्मिनस आणि ठाणे या स्थानकांवरही रुफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले आहेत. भारतीय रेल्वे आपल्या 51 हजार हेक्टर रिकाम्या प्लॉटवर येणाऱया काळात म्हणजे 2030 पर्यंत 20 मेगावॅट इतकी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून तयार करणार आहे. तसे निर्धारीत लक्ष्य समोर ठेवले असून यासाठीची योजना रेल्वेकडून रितसर आखण्यात येत आहे.