केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, काही शर्ती लागू, राज्यांनी व्यवस्था करण्याची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात काम करत असलेले परराज्यातील कामगार, लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले प्रवासी, विद्यार्थी तसेच भाविक यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग केंद्र सरकारने मोकळा केला आहे. या निर्णयाची घोषणा बुधवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर करण्यात आली. यामुळे लक्षावधी लोकांना दिलासा मिळाला आहे. मात्र केंद्र सरकारने यासाठी काही अटी लागू केल्या आहेत.
गेले 36 दिवस लॉकडाऊनमुळे अनेक मजूर, कामगार, कर्मचारी, विद्यार्थी, पर्यटक, प्रवासी आणि भाविक विविध राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. रेल्वे व आंतरराज्य वाहतूक बंद करण्यात आल्याने ते आपल्या घरी परतू शकलेले नाहीत. परिणामी, त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अपुरे अन्न, गैरसोयीचा निवारा व औषध-पाण्याचा तुटवडा त्यांना जाणवत आहे. अनेकांकडचे पैसेही संपल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. मात्र या निर्णयामुळे त्यांच्या समस्या संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
काही अटींची पूर्तता आवश्यक
शारीरिक अंतर राखणे आणि कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी जे इतर नियम लावण्यात आले आहेत, त्यांचे कसोशीने पालन करणे ही महत्त्वाची अट आहे. सध्या हे स्थलांतरित ज्या राज्यांमध्ये आहेत, त्या राज्यांमध्ये त्यांची नोंद करून ठेवण्यात येईल. यासाठी त्या-त्या राज्यसरकारांनी किवा केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी अधिकाऱयांची नियुक्ती करावयाची आहे. पाठवणी करणारे राज्य आणि या स्थलांतरितांना घेणारे राज्य यांनी एकमेकांशी विचार विनिमय करून त्यांच्या पाठवणीची रूपरेषा ठरवावयाची आहे. स्थलांतरितांची पाठवणी करण्याआधी त्यांची तपासणी व चाचणी करावी लागणार आहे. ज्यांना विषाणूची बाधा झालेली नाही, अशा स्थलांतरितांचीच पाठवणी करावी लागणार आहे. पाठवणी करण्यासाठी बसचा उपयोग करण्याची सूचना राज्यांना करण्यात आली आहे.
स्वराज्यात पोहचल्यानंतर…
स्थलांतरित लोक त्यांच्या राज्यात पोहचल्यानंतर तेथे पुन्हा त्यांची तपासणी होईल. ही तपासणी करण्यासाठी विशेष आरोग्य अधिकाऱयांची नियुक्ती करावी लागणार आहे. स्थानिक पातळीवर ही तपासणी होईल. तपासणी व चाचणी पूर्ण होईपर्यंत त्यांना विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करावी लागेल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन स्थलांतरित त्यांच्या घरी पोहचल्यानंतरही त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार असून आवश्यकतेनुसार त्यांची तपासणी केली जाईल.
आरोग्य सेतूसाठी प्रोत्साहन
ज्या स्थलांतरितांना स्वराज्यात परत जाण्याच्या या सोयीचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी केंद्र सरकारने तयार केलेल्या आरोग्य सेतू या मोबाईल ऍपचा उपयोग करावा, अशी केंद्राची योजना आहे. हे ऍप उपयोगात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या ऍपच्या माध्यमातून या स्थलांतरितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गटप्रवासही शक्य
स्थलांतरित लोकांना गटाने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र असा प्रवास करताना त्यांना शारीरिक अंतराचा नियम तसेच स्वच्छतेचे इतर नियम पाळावे लागणार आहेत. हे नियम पाळले जातात की नाही यावर संबंधित राज्य सरकारांना लक्ष ठेवावे लागणार आहे, अशा अनेक सूचना करण्यात आल्या.
रुग्णांची संख्या 31 हजार पार
देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 31 हजार 787 झाली आहे. मंगळवार ते बुधवार या चोवीस तासांमध्ये 1 हजार 813 नव्या रुग्णांची भर पडली असून याच कालावधीत 71 जण प्राणांस मुकले आहेत. एकंदर मृत्यूंची संख्याही 1 हजाराच्या पुढे गेली असून ती आता 1 हजार 8 इतकी आहे. एकंदर 7 हजार 796 रुग्ण बरे झाले असून त्यांचे प्रमाण 24.52 टक्के आहे. या प्रमाणात दिवसेंदिवस होणारी सुधारणा दिलासादायक आहे. भारतात अद्यापही सामाजिक संक्रमण सुरू झालेले नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. मंगळवार ते बुधवार या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 31 जणांचा मृत्यू झाला. तर गुजरातची संख्या 19 आहे. देशात 380 जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा प्रवेशही झालेला नाही. तर 88 जिल्हय़ांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण नाही.