सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी :
स्मार्ट सिटीचे काम सुरू होऊन बरेच महिने उलटले तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. या कामामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. गुरुवारी स्मार्ट सिटीच्या कामाने एका चौदा वर्षीय मुलाचा बळी घेतला. समर्थ भास्कर असे या मुलाचे नाव आहे.
गुरुवारी अमावस्या असल्यामुळे शासकीय रुग्णालयामधील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवी मातेचे दर्शन घ्यावे यासाठी समर्थ हा घरातून सायकलवर निघाला होता. दत्त चौक मार्गे लक्ष्मी मार्केटकडे सायकलवर जात असताना खैरमोडे दुकानासमोर बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टरचा त्याला धक्का लागला. त्यामुळे तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला. ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी शिवसेनेचे प्रताप चव्हाण आणि महेश धाराशिवकर यांनी स्मार्ट सिटीचे काम करणारे मक्तेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.