शहरी भागात नोकरीसाठी होणारे स्थलांतर आणि वाढती लोकसंख्या याचा विचार करता सध्या असणारे रेल्वेचे जाळे अपुरे ठरते. अशावेळी पर्याय म्हणून आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील भार कमी व्हावा, खासगी वाहनांमुळे होणारे प्रदूषण टळावे, यासाठी मेट्रोची गरज प्रकर्षाने पुढे आली. भविष्यातील तंत्रज्ञानाच्या अचाट कामगिरीचे दर्शन हळूहळू होऊ लागले आहे. रिमोटवर चालणारी खेळण्यातील रेल्वे मजेशीर भासते. तशी आता विनाचालक मेट्रोही धावू लागलीय. अलीकडेच दिल्लीत देशातील पहिली स्वयंचलित (ड्रायव्हरलेस) मेट्रो धावू लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेचे उद्घाटन केले. भविष्यात अनेक मार्गावर अशातऱहेची मेट्रो चालविण्याचा विचार आहे.
दिल्ली मेट्रोवरील खर्च…
पहिला टप्पा खर्च 10 हजार 571 कोटी
दुसरा टप्पा खर्च 18 हजार 783 कोटी
तिसरा टप्पा अंदाजित खर्च 41 हजार 79 कोटी
चालकाविना चालणाऱया मेट्रोमुळे भारताने जगातील निवडक शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. दिल्लीतील मजेंटा मार्गावर चालणारी देशातील पहिली चालकविरहीत मेट्रो जनकपुरी पश्चिम ते बॉटनिकल गार्डन या मार्गावर चालेल. सध्या 37 किलोमीटर अंतरावर ही गाडी धावेल. या मेट्रोत अत्याधुनिक सुविधा देण्यात येतील. प्रवाशांना आरामदायी सुविधा देण्यात आल्या आहेत. या मेट्रोला सहा कोच आहेत. दिल्लीत पहिल्या टप्प्यात मजेंटा लाईनच्या जनकपुरी पश्चिम ते नोएडाच्या बॉटनिकल गार्डन स्थानकादरम्यान चालकविरहीत मेट्रो गाडय़ा धावणार आहेत. या मार्गावर ही सेवा पूर्णपणे यशस्वी झाल्यानंतर त्याचा विस्तार केला जाणार आहे. तीन वर्षांपूर्वी मजेंटा लाईनवर मेट्रो सेवा सुरू झाली. त्यानंतर आता याच मार्गावर चालकविरहीत मेट्रो सेवा सुरू झाली आहे. चालकरहीत असलेली ही मेट्रो पूर्णत: स्वयंचलित असेल. त्यात मानवीय हस्तक्षेप कमीत कमी असेल. त्यामुळे मानवी चुका घडणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. पिंक लाईनवर ही मेट्रो सुरू झाल्यावर या मेट्रोचे नेटवर्क 94 किलोमीटर होईल.
देशात सन 2014 मध्ये केवळ 248 कि.मी. इतक्मया अंतरावर मेट्रो लाईन सुरू होत्या. आज तिप्पट जास्त म्हणजेच 700 कि.मी. अंतरावर मेट्रो धावत आहेत. सन 2025 पर्यंत आम्ही त्या 1,700 कि.मी. पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेट्रोचा विस्तार करताना ‘मेक इन इंडिया’ मोहीम महत्त्वाची भूमिका बजावत असून त्यामुळे प्रकल्पांचा खर्च कमी झाला. विदेशी चलनाचीही बचत झाली आहे. तसेच देशातील नागरिकांना अधिक रोजगारही उपलब्ध झालाय.
कंट्रोल रुममधून संचलन
चालकविरहीत रेल्वे सध्या काही देशांमध्येच चालविली जाते. दिल्लीतील ही मेट्रो देशातील पहिलीच चालकविरहीत मेट्रो आहे. देशात ही एक नवी क्रांती मानली जात आहे. ही मेट्रो कशी चालविली जाते, याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे. मात्र, मेट्रो भवनातील केंद्रीय कंट्रोल रुममधून याचे संचलन केले जाणार आहे.
94 किलोमीटर मार्गावर चालणार
दिल्ली मेट्रोच्या 94 किलोमीटर मार्गावर चालकविरहीत रेल्वे चालविली जाणार आहे. हे प्रमाण जगभरात चालविल्या जाणाऱया चालकविरहीत रेल्वेच्या 9 टक्के आहे. सध्या जगभरात असलेल्या एकूण मेट्रो नेटवर्कच्या 7 टक्के इतक्या मार्गावर चालकविरहीत मेट्रो चालविली जाते.
वेग व प्रवासी क्षमता…
चालकविरहीत रेल्वे जास्तीत जास्त 95 किमी वेगाने धावणार आहे. तर याचा कमीत कमी वेग 85 किमी प्रतितास राहील. या गाडीत उच्चतम ब्रेक सिस्टीम, एलईडी लायटिंग आणि वातानुकुलित व्यवस्था आहे. रेल्वेच्या एका कोचमधून 380 प्रवासी तर पूर्ण गाडीतून 2,280 प्रवासी प्रवास करू शकतील.
चालकविरहीत रेल्वेचा फायदा
सध्या मेट्रो मार्गावर 5 मिनिट 12 सेकंदाच्या अंतराने गाडय़ा धावतात. जर या मार्गावर प्रवासी संख्या वाढली तर 90 सेकंदांच्या अंतराने गाडय़ा धावू शकतील. आणि याचा प्रवाशांना फायदा होईल. चालकविरहीत रेल्वेमुळे या मार्गावर फेऱयांची संख्या वाढेल. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागणार नाही. मेट्रोच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकेल. सध्या प्राथमिक टप्प्यात 37 किमी मार्गावर ही मेट्रो धावणार आहे. मात्र, भविष्यात मजलिस पार्क ते शिवविहार या 57 किमी मार्गावर 2021 पर्यंत ही मेट्रो धावणार आहे.
‘मेट्रो’चा विस्तार
मागील सहा वर्षात देशभरात मेट्रो नेटवर्कमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2014 मध्ये पाच शहरांमध्ये 248 किमी मार्गावर मेट्रोचे जाळे होते. सद्यस्थितीत 18 शहरांमध्ये मेट्रोचे 702 किमीचे नेटवर्क आहे. आगामी 2022 पर्यंत 27 शहरांमध्ये एक हजार किमीपर्यंत नेटवर्क विस्तारण्यात येणार आहे. त्यामुळे रोज सुमारे 1 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील. सद्यस्थितीत दिल्ली मेट्रो 390 किमी मार्गावर चालते. याच्या 11 कॉरिडॉरवर 285 स्थानके आहेत.
85 लाख लोकांचा दररोज मेट्रो प्रवास
2014 मध्ये केवळ पाच शहरांमध्ये मेट्रो रेल्वे होती. आज 18 शहरांमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा आहे. 2025 पर्यंत आपण ती 25 पेक्षा अधिक शहरांपर्यंत विस्तारणार आहे. 2014 मध्ये देशात केवळ 248 किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यन्वित होता. आज तो सुमारे तिप्पट म्हणजेच सातशे किलोमीटरपेक्षा अधिक आहे. 2025 पर्यंत आपण याचा विस्तार 1,700 किलोमीटरपर्यंत करण्याचा प्रयत्न आहे. 2014 मध्ये मेट्रोमधून प्रवास करणाऱयांची संख्या दररोज 17 लाख होती. आता ही संख्या पाचपट वाढली आहे. आता 85 लाख लोक दररोज मेट्रोतून प्रवास करतात.
भविष्यात वॉटर मेट्रो
विविध शहरांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारच्या मेट्रो रेल्वेवर काम सुरू आहे. ‘मेट्रो लाईट’द्वारे जिथे प्रवासीसंख्या कमी असलेल्या मार्गांवर काम सुरू आहे. त्याचे बांधकाम सामान्य मेट्रोच्या 40 टक्के खर्चातूनच तयार होते. ‘मेट्रो नियो’च्या माध्यमातून प्रवासीसंख्या आणखी कमी असलेल्या ठिकाणी प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. त्यासाठी सामान्य मेट्रोच्या केवळ 25 टक्के खर्च येतो. ‘वॉटर मेट्रो’ हा देखील पठडीबाहेरचा प्रयोग आहे. ज्या शहरांमध्ये मोठे जलाशय आहेत तिथे आता ‘वॉटर मेट्रो’ सुरू होऊ शकते. सध्या कोची येथे ‘वॉटर मेट्रो’चे काम सुरू आहे. शहरांमधील उत्तम संपर्क व्यवस्थेबरोबरच परिसरातील बेटांवरील लोकांना अंतिम स्थानापर्यंत वाहतूक व्यवस्थेचा लाभ या माध्यमातून मिळू शकेल.
मुंबईतही मेट्रो विस्तारतेय
लाखो मुंबईकरांना आपल्या पोटात घेऊन साधारणपणे 2,150 रेल्वेगाडय़ा रोज शहरामधून धावतात. जिथे मुंगी शिरायलासुद्धा जागा नसते अशा रेल्वेतून सुमारे 75 लाख प्रवाशांना रोजचा प्रवास करावा लागतो. मुंबईसाठी आता रेल्वेशी समांतर अशी मेट्रो रेल्वेच्या रुपाने दुसरी ‘लाईफलाईन’ अत्यावश्यक बनली आहे.
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मुंबई मेट्रो-3 हा प्रकल्प भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वाहतुकीचे चित्र बदलू शकतो. 33.5 कि.मी. लांबीचा हा मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वेमधील गर्दी कमी करू शकतो व त्याचप्रमाणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवू शकतो. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे करण्यात येत आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या समान भागिदारीमध्ये एक संयुक्त प्रकल्प म्हणून हे कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले आहे.
मुंबईत लोकांच्या दारापर्यंत मेट्रो पोहोचवून आता अपुऱया ठरणाऱया मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवेला पूरक ठरणारी सार्वत्रिक जलद वाहतूक प्रणाली बनण्याचा मेट्रो रेल्वेचा प्रयत्न आहे. मुंबई मेट्रो-3 प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मोठय़ा
प्रमाणावर रहदारीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येईल. मुंबई मेट्रो-3 प्रकल्पामुळे सुमारे 16 लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकुलीत डब्यातून प्रवास करणे शक्य होईल त्याचप्रमाणे प्रवासाच्या वेळेत घट, ध्वनी व हवेच्या प्रदूषणात घट, सुरक्षित व आरामदायी प्रवास अशा अनेक सोयी-सुविधा उपलब्ध होतील. संपूर्णपणे भुयारी असणाऱया मेट्रो मार्गावर 27 स्थानके असतील. हा मार्ग मुंबईतील सहा महत्वपूर्ण व्यावसायिक केंद्रांशी, 30 शैक्षणिक संस्था, 30 मनोरंजनाची ठिकाणे आणि तसेच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ इत्यादींशी जोडणी उपलब्ध करून देईल. पाच स्थानके उपनगरीय रेल्वेशी अदलाबदल करण्यासाठी असतील, ज्यामध्ये एक मोनोरेलसाठी व एक ‘वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर’ मेट्रो-1 साठी असेल.
प्रदुषणावर मात
मेट्रोमुळे प्रदूषण कमी होतेय. मेट्रो प्रदूषण कमी करण्याचेदेखील खूप मोठे माध्यम आहे. मेट्रोच्या जाळय़ामुळे रस्त्यावरील हजारो वाहने कमी झाली आहेत. मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरणारी वाहने प्रदुषणाला कारण ठरतात. मेट्रोमुळे प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होत आहे.
‘रोजगार’निर्मिती
मेट्रो सेवांच्या विस्तारासाठी मेक इन इंडियावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून विदेशी चलन वाचण्याबरोबरच देशातच लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळतो. आज चार मोठय़ा कंपन्या देशातच मेट्रो कोचची निर्मिती करत आहेत. डझनभर कंपन्या मेट्रोच्या सुटय़ा भागांची निर्मिती करत आहेत.
ऊर्जा बचत
आज मेट्रो रेल्वेत 130 मेगावॅट सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे. भविष्यात तो वाढवून 600 मेगावॅटपर्यंत नेला जाईल. हा वापर वाढल्यास वीजेची मोठय़ा प्रमाणात बचत होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे सुसज्ज प्लॅटफॉर्म्स आणि क्रीनिंग दरवाजे या आधुनिक तंत्रज्ञानावरही काम सुरू आहे.
वेळ वाचणार
मेट्रोमधून प्रवास करणाऱयांना एक टोकन घेण्यासाठी नेहमी रांगेत उभे रहावे लागते. कार्यालय किंवा महाविद्यालयात पोहोचायला उशीर होतो. वर तिकीट काढण्यासाठी त्रास होत आहे. मेट्रोतून उतरले तरी बसचे तिकीट घ्यावे लागते. आज प्रत्येकाकडे वेळ अपुरा असल्यामुळे त्यावर मात करण्याच्या दृष्टीनेही भविष्यात प्रयोग राबविले जात आहेत. राष्ट्रीय स्तरावर कॉमन मोबिलिटी कार्ड याच दिशेने एक खूप मोठे पाऊल आहे. तुम्ही जिथून कुठून प्रवास कराल, तुम्ही ज्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाद्वारे प्रवास कराल, त्यासाठी हे एक कार्ड तुम्हाला एकात्मिक प्रवेश मिळवून देणार आहे.
-संकलन : राजेश मोंडकर, सावंतवाडी