प्रतिनिधी /बेळगाव :
सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे हंदिगनूर येथे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नजीकच असणाऱया पूलावर पाणी आले होते. त्यामुळे काही काळ हा मार्ग बंद होता.
आलेल्या जोरदार पावसामुळे शेतातील बांध फुटून शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भात लागवडीचे काम अंतिम टप्प्यात आले. त्यामुळे नाल्याच्या परिसरात भात लागवड करण्यात आली होती. मात्र सोमवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे भात पिकाचेही नुकसान झाले आहे.
पूल पाण्याखाली गेल्याने हा मार्ग काही काळ बंद होता. त्यानंतर तब्बल दोन ते तीन तास हा पूल पाण्याखाली होती. यामधून प्रवास करताना नागरिकांना कसरत करावी लागली. नाल्यातील पाईमध्ये गाळ साचल्याने सर्व पाणी पूलावरुन जात होते. हा पाऊस गेल्यानंतरही तब्बल दीड ते दोन तास पूल पाण्याखाली होते. मात्र काही तर जीवावर उदार होवून यावरुन प्रवास करतानाचे चित्र दिसून आले. याकडे आता गांभीर्याने लक्ष देवून हे पूल उंच करुन नव्याने बांधावे, अशी मागणी होत आहे.
कर्नाटकातून महाराष्ट्रात जाण्यासाठी हा रस्ता अति महत्वाचा आहे. यावरुन दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र सोमवारी पडलेल्या पावसामुळे वाहतूक थांबली होती. या पूलाची उंची वाढविणे गरजेचे बनले आहे. त्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.