सांप्रतच्या काळात जे नवनवे शोध लागत आहेत, तंत्रज्ञान विकसित होत आहे किंवा मानवाच्या ज्ञानात विविध प्रकारची भर पडत आहे, त्याची माहिती हजारो वर्षांपूर्वीपासून आपल्या पूर्वजांना होती, असा अनेकांचा विश्वास आहे. तर काही जण या विश्वासाला अंधश्रद्धा मानतात. तथापि, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जेव्हा आपल्या निर्णयपत्रात पूर्वजांच्या ज्ञानाचा उल्लेख करतात, तेव्हा त्याला निश्चितच महत्त्व प्राप्त होते. मद्रास उच्च न्यायालयानेही अशीच एक टिप्पणी केली आहे.
आज जे तंत्रज्ञान शोधल्याचा दावा केला जातो, ते हजारो वर्षांपूर्वीपासून आपल्या संस्कृतीत प्रचलित होते. तसेच त्यांचे वर्णनही करून ठेवण्यात आले आहे, अशी टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. महादेवन आणि न्या. पी. डी. अदिकेसावलू यांनी आपल्या आदेशात केली आहे. हे प्रकरण प्राचीन मंदिरांच्या सुरक्षिततेसंबंधीचे होते. प्राचीन मंदिरांची रचना सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार बांधलेल्या इमारतींपेक्षाही सुदृढ आहे. त्यामुळे निसर्गाच्या असंख्य लहरी झेलत ही मंदिरे हजारो वर्षे पूर्वीच्याच स्थितीत सुरक्षित आहेत. त्यांची सुरक्षितता भविष्यकाळातही सुनिश्चित करण्यासाठी ऐतिहासिक वारसा संरक्षण आयोग स्थापन करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. आपले पूर्वज अभ्यासू आणि बुद्धिमान होते. त्यांनी विविध तंत्रज्ञानांची आणि शास्त्रांची निर्मिती केली. जी आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते. त्यामुळे या तंत्रज्ञानांची प्रतीके असणारे ऐतिहासिक वारसे जपणे आवश्यक आहे, असे या न्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे.