मनमानी कारभाराचा पुन्हा फटका : कणकवलीतील प्रकार : शेकडो लीटर पाणी वाया
वार्ताहर / कणकवली:
महामार्ग चौपदरीकरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा एकदा कणकवली शहरातील न. पं.ची नळयोजनेची नवीन पाईपलाईन फुटल्याने शेकडो लीटर पाणी वाया गेले आहे. येथील ऍड. उमेश सावंत यांच्या घरासमोरील गटारानजीक स्ट्रीट लाईटच्या खांबासाठी खड्डा खोदताना महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीकडून खबरदारीच्या उपाययोजना न घेतल्याने ही पाईपलाईन फुटली. रविवारी सकाळपासून ऐन उन्हाळ्य़ात शेकडो लीटर पाणी वाया गेले आहे.
महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीकडून यापूर्वी बीएसएनएलची केबल तोडण्याचा प्रकार वारंवार घडत होता. त्यामुळे बीएसएनएलचे अधिकारीही पुरते हैराण झाले होते. बीएसएनएलने नव्याने टाकलेली केबलही ठेकेदार कंपनीच्या पोकलॅनने अनेकदा तोडल्याने याबाबत पोलिसांत तक्रारही दिली होती.
याचप्रकारे कणकवली नळयोजनेच्या पाईपलाईन काम करताना तुटण्याचे प्रकार वारंवार घडत असताना याचा फटका शहरातील नळधारकांना बसत आहे. शनिवारी शहरातील ऍड. सावंत यांच्या घरासमोरील पथदीपांसाठी खड्डा खोदताना नव्याने टाकलेली पाईपलाईन तोडण्यात आली. चौपदरीकरणाचे काम सुरू केल्यानंतर छ. शिवाजी महाराज चौक ते नरडवे चौकापर्यंत नळयोजनेची ही नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती. मात्र, ठेकेदार कंपनीकडून या भागात काम करताना खबरदारी न घेतल्याने ऐन उन्हाळ्य़ात शेकडो लीटर पाणी वाया गेले आहे. याबाबत येत्या काळात ठेकेदार कंपनीने शहरावासियांची गैरसोय होता नये, याची खबरदारी घेण्याची मागणी केली जात आहे.