ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचे संकट चालू असताना आता बर्ड फ्लू चा विळखा वाढताना दिसत आहे. राजस्थानमधील वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेल्या 252 कावळ्यांच्या मृत्यूनंतर आता हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये काही पक्षी अचानक मरण पावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यामध्ये पोंग धरणा जवळील अभयारण्यात 1700 स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळून आले. यामध्ये सोमवारी मरण पावलेल्या 550 पक्षांचा देखील समावेश आहे.
यासोबतच केरळमध्ये कोट्टायम जिल्ह्यात 1500 बदकांना बर्ड फ्लू ची लागण झाली. तर राजस्थानमधील झाला वाड आणि नगौर जिल्ह्यांमध्ये काही मोरांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
दरम्यान, सरकारकडून मृत पक्षांची तपासणी केली जाणार आहे. तर विविध 15 ठिकाणावरून घेतलेले मृत पक्षी उत्तर प्रदेशातील बरेली येथील भारतीय पशुवैद्यक संशोधन तपासणी साठी नेण्यात येणार आहेत. यासोबतच बर्ड फ्लू विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.