कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांचा सवाल : आरोग्य सर्व्हे करणाऱया कर्मचाऱयांना विमा संरक्षण नाही
..अन्यथा आंदोलन करावे लागेल!
वार्ताहर / कुडाळ:
कुडाळ नगर पंचायत क्षेत्रात सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सर्व्हेसाठी न. पं. कर्मचारी व आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करताना त्यांना विमा संरक्षण दिले नाही. ही प्रशासनाची जबाबदारी नाही का?, असा सवाल कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी केला आहे.
या कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होऊन बळी गेल्यास जिल्हा प्रशासन त्याला जबाबदार राहील. जोपर्यंत ही जबाबदारी घेतली जात नाही, तोपर्यंत सर्व्हेचे काम थांबवावे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शासनाने महाराष्ट्रात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. कुडाळ न. पं. हद्दीमध्ये न. पं. कर्मचाऱयांना या मोहिमेंतर्गत अतिरिक्त काम दिले आहे. ‘कोविड-19’ या कालावधीमधील न. पं. हद्दीत करण्यात येणारा हा तब्बल पाचवा सर्व्हे आहे तसेच या कर्मचाऱयांना न. पं. चे काम सांभाळून हे काम करावे लागत आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.
कोरोनाची लागण होण्याची शक्यता
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत असून कुडाळ शहरात याची मोठी लागण झाली आहे. कुडाळ न. पं. प्रशासनाच्यावतीने पंधरा कर्मचारी व पाच आशा सेविका यांची नियुक्ती आहे. परंतु या कर्मचाऱयांना प्रशासनाने कोणतेही विमा संरक्षण दिलेले नाही. या कर्मचाऱयांच्या घरी वृद्ध आई-वडील तसेच लहान मुलेही आहेत. सर्व कर्मचारी घरोघरी फिरत असल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती तेली यांनी व्यक्त केली. हे कर्मचारी सर्व्हेसाठी घरोघरी फिरत असल्याने काही घरात त्यांना काहीही माहिती न देता माघारी पाठविले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
तोपर्यंत सर्व्हे थांबवा!
जिल्हा प्रशासन न. पं. कर्मचारी व आशा सेविकांना विनाकारण वेठीस धरत आहे. पाचवेळा सर्व्हे करून प्रशासनाने काय साध्य केले? ‘माझे कुटुंब व माझी जबाबदारी’, मग या कर्मचाऱयांची जबाबदारी प्रशासनाची नाही का?, असे प्रश्न उपस्थित करून मोबाईल क्रमांक जाहीर करून व्हॉट्सऍपद्वारे प्रत्येक कुटुंबाची माहिती मिळू शकते. सर्व्हे करणाऱया या कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होऊन कुणाचा बळी गेल्यास सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार राहील. प्रशासन जोपर्यंत त्यांची सर्व जबाबदारी घेत नाही, तोपर्यंत सर्व्हे थांबवावा. अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.