सातारा / प्रतिनिधी :
देशाच्या सीमेचे रक्षण करताना जिल्ह्यातील अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामध्ये 18 नोव्हेंबर 2015 रोजी हुतात्मा झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाची घोषणा सातारा पालिकेच्यावतीने करण्यात आली होती. तब्बल पाच वर्ष उलटली तरीही स्मारकाची एक वीटही उभी राहिली नाही. सातारा पालिकेची अनास्था यामधून दिसून येत आहे. काही दिवस जागाच उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव तर काही दिवस मंजूरीच्या कारणास्तव हे घोंगडे भिजत पडले आहे. आता जिल्हा नियोजन समितीमध्ये हा प्रस्ताव अडकलेला आहे.
सातारा पालिकेने हुतात्मा महाडिक यांचे स्मारक साताऱ्यात करण्याचा सभागृहात ठराव घेतला. त्यास सभागृहाने मंजूरीही दिली. पुढे सभागृहात चर्चा होवून कागदावर आणले गेले. परंतु गेल्या काही वर्षामध्ये जागेचा प्रश्न उपस्थित झाला. वायसी कॉलेजच्या परिसरात सुरुवातीला एका नगरसेवकांने जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु रयतकडून त्यास काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तो मुद्दा तेथेच थांबला अन् पुढे काही दिवसानंतर अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्यासमोरील पालिकेच्या बागेत स्मारक करण्याचा विषय चर्चेला गेला. त्यास काहीच चालना मिळाली नाही. यामध्ये तब्बल पाच वर्षाचा कालावधी उटलून गेला. आता हुतात्मा स्मारकात स्मारक उभे करण्याचा प्रस्ताव सातारा पालिकेने नियाजन समितीकडे पाठवला आहे. त्यास अद्याप मंजूरी नाही. त्यामुळे देश सेवा करताना हुतात्म्य आलेले महाडिक यांच्या स्मारकाच्या बाबतीत सातारा पालिकेची उदासिन भूमिका दिसून येत आहे. पालिकेच्या 2021-22 च्या अर्थसंकल्पात 1 कोटी रुपयांची तरतूदही पालिकेने केलेली आहे. पण ही घोषणा कागदावरच राहिली.