प्रतिनिधी / सातारा :
कारखान्याबद्दल कारखान्याच्या सभासदांनी किंवा कारखान्याला ऊस घालणाऱ्यांनी बोलावं. उदयनराजेंचा आणि कारखान्याचा काही संबंध नाही. कारण त्यांनी शेती कधी केलीच नाही. कारखान्यावरील आरोप हे कोणालाच नवीन नाहीत, कारण नगरपालिका, जिल्हापरिषद सारख्या निवडणुका जवळ आल्या की कारखान्यांवर आरोप हे होतच असतात. हु इज उदयनराजे? त्यांना कारखान्यासंबंधी बोलण्याचा कोणताच नैतीक अधिकार नाही, असे परखड मत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
नुकतेच खा. उदयनराजे भोसले यांनी अजिंक्यातारा कारखान्या संबंधी आरोप केले होते, हे आरोप खोडून काढत त्यांना सडेतोड प्रतिउत्तर शिवेंद्रराजे यांनी दिले. ते म्हणाले की, एफआरपी अंतर्गत 15 दिवसाच्या आत पैसे जमाकरणे बंधनकारक असते. आज अजिंक्यतारा कारखाना 10 व्या दिवसाच्या आत पैसे संबंधीतांच्या खात्यावर एफआरपी अंतर्गत जमा करतो. हा भ्रष्टाचार म्हणायचाय काय उदयनराजेंना, वय वाढेल तसे त्यांची बुध्दी भ्रष्ट होत चालल्याचे दिसत आहे. किंवा त्यांचे बगलबच्चे त्यांना खोटी माहिती देतात का, हे त्यांनी तपासावं.
कारखान्याने कोरोना काळात ही कामगारांचे पगार तसेच त्यांना बोनस ही देण्यात आला आहे. त्यामुळे हा त्यांना भ्रष्टाचार म्हणायचा आहे का, भ्रष्टाचारावर बोलणारे तुम्ही कोण? कारण तुम्ही आमचे सभासद नसल्याने तुम्हाला बोलण्याचा नैतीक अधिकार नाही. छत्रपतींच्या विचारांचे तुम्ही असाल तर लोकसभा निवडणूकीत का पडलात. त्याच विधानसभेच्या निवडणुकीत मी निवडून येऊन तुम्हीच का हरलात याचे उत्तर तुम्ही द्यावे असा सवालही यावेळी त्यांनी केला. तसेच भररात्रीच्या सुमारास मोठमोठय़ाने गाणी लाऊन फिरणे हे उदयनराजेंच्या मते छत्रपतींचे विचार आहेत का? यात्रेमध्ये ज्याप्रमाणे डोंबाऱ्याचा खेळ असतो त्याप्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ मांडण्यात आला होता. आपण राज्यसभेचे खासदार आहोत याचे भान कोठेतरी ठेवले पाहिजे, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.