हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा जाहीरनामा घोषित
वृत्तसंस्था/ सिमला
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात अनेक ‘विनामूल्य’ आश्वासने देण्यात आली आहेत. प्रत्येक घराला 300 युनिट वीज विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी 1 लाख नवे रोजगार निर्माण केले जाणार आहेत. 18 ते 60 या वयोगटातील प्रत्येक महिलेला प्रति महिना 1500 रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय इतर आश्वासने आहेत.
काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष धनीराम शांडील्य यांनी जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. सत्ताधारी भाजपने कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे यंदा हिमाचल प्रदेशामधील जनता काँग्रेसचे भरभरून समर्थन करेल, असा विश्वास पक्षाला वाटतो. राज्यात प्रचार करत असताना याचे प्रत्यंतर येते. लोकांना राज्यात सत्तापरिवर्तन हवे आहे, असे प्रतिपादन त्यांनी जाहिरनामा प्रकाशनाच्यावेळी केले.
अनेक नेते उपस्थित
जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेते उपस्थित होते. त्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बगेल, हिमाचल प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला, प्रदेश काँग्रेसच माजी अध्यक्ष सुखजिंदर सिंग, सुखु आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव तेजिंदरपाल बिट्टू आणि मनीष छत्रथ यांचा समावेश आहे. काँग्रेसच राज्याची प्रगती घडवू शकेल, असा दावा जाहीरनामा प्रकाशनाच्या प्रसंगी व्यासपीठावरील अनेक नेत्यांनी केला.
काँग्रेसने हा जाहीरनामा हिमाचल प्रदेशच्या सर्व स्तरांमधील लोकांशी विचारविमर्ष करून तयार केला आहे. लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब या जाहीरनाम्यात आहे. अंमली पदार्थ विरोधी दल स्थापन करणे आणि त्याचे नेतृत्व निवृत्त न्यायाधीशाकडे देणे. तसेच भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी अधिकाऱयांची छळवणूक करण्यासाठी केलेल्या सर्व बदल्या रद्द करणे आदी आश्वासनेही प्रकाशन कार्यक्रमात नेत्यांनी दिली आहेत.
टॅक्सी चालकांना अल्प व्याजदराने कर्ज, टॅक्सी परवाना कालावधी 10 वर्षांवरून 15 वर्षांवर करणे, पत्रकारांना निवृत्तीवेतन, बंदूक परवाना शुल्कात कपात, इत्यादी आश्वासनेही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. भाजपने या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसची सरकारे असणाऱया कुठल्याही राज्यात महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात का येत नाहीत? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. हिमाचल प्रदेशच्या जनतेला केवळ दिशाभूल करणारी आश्वासने देण्यात आली आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.