प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सद्या मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याची गळती आणि आवश्यक असलेल्या दुरुस्तीची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे या दुरुस्तीसाठी प्राथमिक टप्प्यात 10 कोटी निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश चव्हाण यांनी शनिवारी भेटीमध्ये दिले आहेत. यासंदर्भात येथील सर्व लोकप्रतिनिधी तसेच मंत्री व आमदार उदय सामंत यांच्याशीही चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. दोन मजली व सुमारे 225 खाटांची क्षमता असलेल्या या हॉस्पीटलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गळती मोठया प्रमाणावर आहे. तसेच रुग्णालयाची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. रुग्णालयात डॉक्टर्स, कर्मचारी यांनी चांगल्या वातावरणामध्ये आरोग्य सेवा करणे हे देखील फार महत्वाचे आहे. त्यामुळे आवश्यक सर्व सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे यामध्ये आपण स्वतः आणि स्थानिक आमदार व मंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी सर्व जण मिळून यामध्ये अजून कशी सुधारणा होईल यासाठी प्रयत्न करुन असेही प्रतिपादन केले. या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्या चव्हाण यांनी या रुग्णालयाच्या भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गोष्टी प्रामाणिकपणे करण्याचा आपला प्रयत्न आहे. ज्या जनतेच्या हिताच्या आहेत त्याला प्राधान्य देण्याच काम हे येणाऱया काळामध्ये केले जाईल असे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितल्याचे मंत्री चव्हाण यांनी या रुग्णालयाच्या भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या सर्व व्यवस्था सुधारणांच्या संदर्भात स्थानिक संबंधित अधिकारी यांना कशा सुधारणा करायचला पाहिजेत याबद्दल सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत. हा सर्व विषय तिथे असणाऱया रुग्णालयातील स्टाफ व सा.बां.विभागाचे अधिकारी या सर्वांनी मिळून एक ऍक्शन प्लॅन (कृती आराखडा) तयार करायला सांगितले आहे. त्या प्लॅन नुसार बजेटमध्ये कराव्याच्या तरतूदी संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. तसेच, या संपूर्ण व्यवस्थेच्या सुधारणा करण्यासाठी संबंधित ज्या ज्या विभागांशी फॉलोअप (समन्वय) आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे मंत्री चव्हाण यांनी आश्वासित केले. माझ्या खात्याशी संबंधित असलेल्या सर्व मंजूरी आपण प्रदान करीत असल्याचेही चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आवश्यकता भासल्यास सीएसआर मधुन तातडीने फंड उभारणार–मंत्री रवींद्र चव्हाण
रुग्णालयाच्या दुरुस्तीची बाब ही खर्चीक असल्यामुळे या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब ध्यानात आली आहे. परंतु, रत्नागिरी परिसरातील नागरिकांसाठी हे रुग्णालय अतिशय महत्वाचे आहे. या रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यात साधारणपणे 10 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात 10 कोटीचा खर्च करुन हॉस्पीटलची दुरुस्ती तातडीने होत असेल तर त्या दृष्टीने येथील सर्व संबंधितांशी चर्चा करुन या गोष्टी तातडीने कशा काय पूर्ण करता येतील या बाबत निर्णय घेण्यात येईल. आवश्यकता भासल्यास सीएसआरच्या माध्यमातून तातडीने फंड उभारण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.