अवैध दस्तऐवजांसह भारतात केला प्रवेश
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये 6 महिलांसह म्यानमारच्या 10 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. म्यानमारच्या या नागरिकांनी कुठल्याही वैध दस्तऐवजाशिवाय भारतात घुसखोरी केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. म्यानमारचे नागरिक भारतात शिरल्याची माहिती मिळाली होती. याच्या आधारारव न्यू लमका शहरातील वाल वेंग भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली. यादरम्यान म्यानमारच्या नागरिकांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पकडण्यास पोलिसांना यश आले.
6 घुसखोर हे म्यानमारच्या मोंगवा येथील रहिवासी आहेत. सर्व घुसखोरांच्या विरोधात विदेशी अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अवैध स्थलांतरितांना आश्रय देणाऱयांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यापूर्वी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी दिला होता. म्यानमारची 398 किलोमीटर लांबीची सीमा मणिपूर या राज्याला लागून आहे.
अवैध स्थलांतरित हे राज्यासाठी मोठा धोका ठरू शकतात. अवैध स्थलांतरितांची ओळख पटविण्यासाठी लवकरच घरोघरी सर्वेक्षण केले जाणार आहे. विदेशी नागरिकांना भाडेतत्वावर स्वतःच्या घरात राहण्याची अनुमती देणाऱयांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.