पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’
भारताच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतून देशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या माध्यमातून केला. देशात यशस्वी झालेली लसीकरण मोहीम देशाच्या शक्ती आणि ऊर्जेचे प्रत्यंतर दाखवत आहे. 100 कोटी कोविडविरोधी लसीच्या डोसनंतर आज देशात एक नवा उत्साह संचारला असून नव्या ऊर्जेसह ही मोहीम पुढे जाईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तसेच भारत विश्वशांतीसाठी नेहमीच प्रयत्न करणार असल्याचेही नमूद करत त्यांनी विविध देशांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दलही माहिती दिली. त्याचप्रमाणे भारतीय महिला आता विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करत असल्याचे सांगत नारीशक्तीचा गौरव केला. पंतप्रधान मोदी यांनी 82 व्या ‘मन की बात’मधून रविवारी जनतेशी संवाद साधला. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान अशाप्रकारे देशवासियांना संबोधित करतात.
100 कोटीचा आकडा खूप मोठा आहे, परंतु त्याच्याशी अनेक लाखो लहान लहान प्रेरक आणि अभिमानास्पद असे अनेक अनुभव, उदाहरणे जोडली गेली आहेत. आपल्या आरोग्य कर्मचाऱयांनी आपले अथक परिश्रम आणि निर्धाराने एक नवीन उदाहरण समोर ठेवले. त्यांनी नाविन्यपूर्णतेसह आपल्या दृढ निश्चयाने मानवतेच्या सेवेचा एक नवीन निकष स्थापित केला. त्यांच्या बाबतीत तर अशी असंख्य उदाहरणे आहेत की, त्यांनी कशी सर्व आव्हानांना पार करून जास्तीत जास्त लोकांना सुरक्षा कवच प्रदान केले, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात लसीकरण मोहिमेला मिळालेल्या सहकार्याबाबत लोकांचे कौतुक केले. तसेच पंतप्रधानांनी संवादादरम्यान पात्र लाभार्थींच्या 100 टक्के लसीकरणाबद्दल उत्तराखंडचे विशेष आभार मानले. यावेळी त्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात उत्तराखंडमधील बागेश्वर येथील आरोग्य कर्मचारी पूनम नौटियाल हिच्याशी संवाद घडवून आणला. पूनमजींनी आपल्या क्षेत्रातील लोकांच्या लसीकरणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. अशाचप्रकारे हजारो कोरोनायोद्धय़ांनी अहोरात्र मेहनत घेतल्यामुळेच उत्तराखंडने शंभर टक्के पहिला डोस देण्याचे काम पूर्ण केले आहे. या राज्यात अधिकाधिक दुर्गम भाग असतानाही येथे मोहीम यशस्वी झाल्याने उत्तराखंड सरकार अभिनंदनास पात्र आहे. तसेच हिमाचलनेही अशा अडचणींवर मात करत 100 टक्के डोस देण्याचे काम पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्याशी संबंधित रांगोळी, चित्रे काढा
आपण आपल्या संयुक्त उपक्रमानेच देशाला नव्या उंचीवर नेऊ शकतो, असे सरदार साहेब सातत्याने म्हणत असत. साहजिकच आपल्यात एकता नसेल तर आपण नव्या संकटात अडकू. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता असेल तरच आपण विकासाची नवी उंची गाठणार आहोत. आपली स्वातंत्र्य चळवळ हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. त्यासाठी रांगोळी रेखाटण्यासह दारावर, भिंतीवर स्वातंत्र्याची प्रेरणा देणारी चित्रे काढली जातील तेव्हाच देशभावना जागृत होतील. अशा माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची रंगतही वाढेल, असे मोदी म्हणाले.