10 सप्टेंबरपासून आरक्षण करता येणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय रेल्वेने प्रवाशांना दिलासा देत 12 सप्टेंबरपासून 80 नवीन विशेष गाडय़ा चालवण्याची घोषणा केली आहे. याकरिता आरक्षण 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. या गाडय़ा सध्या सुरू असलेल्या 200 रेल्वेगाडय़ांव्यतिरिक्त असतील. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी शनिवारी ही माहिती दिली.
देशातील कोरोना संसर्ग लक्षात घेता रेल्वेने 22 मार्चपासून प्रवासी गाडय़ा, मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ांची वाहतूक थांबवली होती. लॉकडाऊन दरम्यान राजधानी विशेष गाडय़ा 12 मेपासून सुरू करण्यात आल्या आणि त्यानंतर 1 जूनपासून 100 अप-डाऊन गाडय़ा चालविण्यात आल्या. अशाप्रकारे सध्या 230 गाडय़ा चालविल्या जात आहेत. आता रेल्वेने 40 नवीन मार्गांवर अप-डाऊन विशेष गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीहून गोरखपूरला जाणारी हमसफर एक्स्प्रेस, दिल्लीहून भागलपूरकडे जाणारी विक्रमशिला एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड, बेंगळूर-नवी दिल्ली, इंदोर-हावडा, ग्वाल्हेर ते मडवाडी बनारससाठी बुंदेलखंड एक्स्प्रेस, म्हैसूर ते सोलापूरकडे जाणारी गोलघुमट एक्स्प्रेस, कोटा ते डेहराडून एक्स्प्रेस नंदा देवी या गाडय़ांचा समावेश आहे.
12 सप्टेंबरपासून 80 नवीन गाडय़ा किंवा 40 अप-डाऊन गाडय़ा सुरू होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या चालविल्या जाणाऱया सर्व विशेष गाडय़ांच्या कामकाजावर नजर ठेवली जाईल आणि जिथे जिथे मागणी किंवा प्रदीर्घ यादीची गरज असेल तेथे वास्तविक टेनच्या आधी ‘क्लोन’ टेन चालविली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. राज्य सरकारच्या विनंतीनुसार परीक्षा किंवा अशा कोणत्याही उद्देशाने गाडय़ा चालवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.