तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराचा मुद्दा ः 5 एप्रिलला होणार सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
14 विरोधी पक्षांनी तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सीबीआय आणि ईडीद्वारे सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे या राजकीय पक्षांनी म्हटले आहे. अटक आणि जामिनासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिशानिर्देश निश्चित करावेत अशी मागणी या राजकीय पक्षांनी केली आहे. या याचिकेवर लवकरत सुनावणी घेण्याची विनंती सरन्यायाधीशांना करण्यात आली होती. राजकीय पक्षांच्या मागणीनंतर सरन्यायाधीशांनी 5 एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस, द्रमुक, राजद, संजद, तृणमूल काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष, माकप, भाकप, बीआरएस, राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, उद्धव ठाकरे गट आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पक्षांच्या वतीने वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखील खंडपीठासमोर हा विषय मांडला आहे.
हे 14 राजकीय पक्ष संयुक्तपणे देशातील सुमारे 42 टक्के मतदारांचे प्रतिनिधित्व करतात. या पक्षांची तपास यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्याची इच्छा आहे. सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप हे पक्ष करत असल्याचे सिंघवी यांनी म्हटले आहे.
राजकीय लोकांवर दाखल असलेल्या खटल्यांपैकी 95 टक्के खटले हे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात आहेत. पूर्वीच नोंद झालेल्या गुन्हय़ांप्रकरणी हस्तक्षेपाची मागणी केली जात नसून अटक आणि जामिनावरून सर्वोच्च न्यायालयाने दिशानिर्देश द्यावेत अशी मागणी असल्याचे सिंघवी यांनी म्हटले होते. त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सरन्यायाधीशांनी 5 एप्रिल रोजी या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले.