मुख्यमंत्री गेहलोत यांची विधानसभेत घोषणा
वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. राज्यात 19 नवे जिल्हे निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजस्थानात आता 50 जिल्हे आणि 10 विभाग असतील. राज्य सरकार नव्या जिल्हय़ांचा 2 हजार कोटी रुपयांच्या निधीतून विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राजस्थान निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारचे हे मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे अनेक विधानसभा मतदारसंघांमधील निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात काही नव्या जिल्हय़ांच्या स्थापनेची मागणी करण्यात येत होती. आम्ही या मागणीची व्यवहार्यता पडताळून पाहण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. याचमुळे मी आता राज्यात नव्या जिल्हय़ांच्या स्थापनेची घोषणा करत असल्याचे गेहलोत यांनी सभागृहात म्हटले आहे.
राजस्थानातील नवे जिल्हे
मुख्यमंत्री गेहलोत यांनी विधानसभेत 19 नव्या जिल्हय़ांची घोषणा केली आहे, यात अनूपगढ, बालोतरा, ब्यावर, डीग, दूदू, जयपूर उत्तर, जयपूर दक्षिण, जोधपूर पूर्व, जोधपूर पश्चिम, गंगापूर सिटी, केकडी, कोटपुतली, बहरौड, खैरतल, नीमकाथाना, सांचोर, फलोदी, सलुंबर, शाहपुरा यांचा समावेश आहे.
एकूण जिल्हय़ांची संख्या 50 वर
मुख्यमंत्र्यांनी 19 नव्या जिल्हय़ांची घोषणा केली असली तरीही राज्यातील एकूण जिल्हय़ांची संख्या 50 च राहणर आहे. जयपूर जिल्हय़ाला जयपूर उत्तर आणि जयपूर दक्षिणमध्ये विभागण्यात आले आहे. तर जोधपूरला जोधपूर पूर्व आणि जोधपूर पश्चिममध्ये विभागण्यात आले आहे.