प्रतिनिधी / सातारा :
जसा मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जातो, तसाच केंद्रीय मंत्र्यांचा सन्मान केला पाहिजे. नारायण राणे हे मुळचे कडवट शिवसैनिक. त्यांची कडक भाषा असणारच. परंतु त्यांनी नेमके काय बोलले ते ऐका. देशाच्या स्वातंत्र्यदिनाला 75 वर्ष होत आहेत, हे मुख्यमंत्र्यांना आठवले नाही. जेव्हा सोबत आठवले होते तेव्हा आठवले होते. राणे कोणालाही भित नाहीत. ठाकरे यांनी सत्तेचा गैरउपयोग करत राणेंवर सुडबुद्दीने कारवाई केली आहे. जसा मुख्यमंत्र्यांचा मानसन्मान केला जातो, तसाच केंद्रीय मंत्र्यांचाही करायला हवा, अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. दरम्यान, कितीही कोणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कट कारस्थाने रचली तरीही 2024 ला सत्ता भाजपा-रिपाइंचीच येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे आले होते. यावेळी आठवले म्हणाले, मध्यंतरी अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. तेथील लोकांना पक्की घरे म्हाडाच्यावतीने बांधण्यासाठी एक-दोन वर्ष लागतील. तोपर्यंत चांगली तात्पुरती घरे राज्य शासनाने द्यावीत. लवकर पूनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी रिपाइंच्यावतीने करत आहोत. नुकतीच महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणसाठी बैठक झाली. त्या बैठकीला सत्ताधारी पक्षातील शिवसेनेने रिपाइंला बोलवले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनामुळेच भिमसेना आणि शिवसेना एकत्र आली. राज्यासह देशात रिपाइंची ताकद आहे. जावली तालुक्यात, भंडारा जिह्यात रिपाइंने ग्रामपंचायता निवडणूक आणल्या आहेत. रिपाइंला त्या बैठकीला बोलवले गेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आराक्षण देण्यासाठी राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे आहे. मराठा समाज हा क्षत्रिय समाज, लढवय्या समाज आहे. काळाच्या ओघात बदल झाला असून या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका रिपाइंची आहे, असेही ते म्हणाले.
त्यावेळी रिपाइंच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, अण्णा वायदंडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, रघूनाथ बाबर, किशोरभाऊ गालफाडे, सातारा तालुकाध्यक्ष अप्पा तुपे आदी उपस्थित होते.