विनोद सावंत, कोल्हापूर
जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आवाहन केले जात आहे. मूर्तीची उंची कमी करा, विसर्जन मिरवणक डॉल्बीमुक्त करा, असेही म्हटले जाते. मात्र, कोल्हापुरातील मंगळवार पेठ, लाड चौक येथील जय शिवराय तरुण मंडळाच्यावतीने तीन दशकांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे. 29 वर्षापासून पालखीतून गणेशमूर्तीचे आगमन आणि विसर्जन केले जाते. या मंडळाने केवळ शहरातीलच नव्हे तर जिह्यातील मंडळांना आदर्श घालून दिला आहे.
कोल्हापूरमध्ये जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिसांकडून नेहमी पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्याचे आवाहन केले जाते. त्याला काही मंडळांकडून प्रतिसादही मिळते. तर काही मंडळ आपल्या भूमिकेवर ठाम असताता. मात्र, मंगळवार पेठेतील लाड चौक येथील जय शिवराय तरुण मंडळ तब्बल 29 वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे.
जय शिवराय तरुण मंडळाची स्थापना 1970 मध्ये झाली. त्यानंतर दरवर्षी थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाच्यावतीने गणेशमूर्तीचे आगमन आणि विसर्जन भव्य मिरवणूक काढून केले जात होते. दरवर्षी आठ ते दहा फुटाची लक्षवेधी गणेशमूर्ती असत.. मात्र विसर्जन मिरवणुकीला होणारा विलंब, वादावादीचे प्रकार यामुळे मंडळाचे अध्यक्षा बाळासाहेब पोवार, दीपक गौड, प्रकाश जगदाळे, सतीश राऊत, सुरेश शंकरराव जाधव, राजू पाटील व दिवंगत नंदकुमार साळोखे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मिरवणूक वेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यासाठी मूर्तीची उंची कमी केली. केवळ सव्वा दोन फुटाची गणेशमूर्ती आणली. विशेष म्हणजे ट्रक्टरमधून गणेशमूर्तीचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक न काढता पालखीतून आणण्यास सुरवात केली. जयशिवराय तरूण मंडळाचे पालखीतून गणेशमूर्ती आणि विसर्जित करण्याचे यंदाचे 29 वे वर्ष आहे. स्वामी विवेकानंद, वारकरी आणि स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी यांच्या वेशातील मिरवणूक आकर्षण ठरली. यंदाही मंडळाने पालखीतूनच मूर्ती आणली असून विसर्जन पालखीतूनच केले आहे.
मंडळाला धार्मिक कार्यक्रमांची परंपरा
‘जय शिवराय‘ची पर्यावरणपूरक गणेशोत्सवा बरोबरच वर्षभर इतरही धार्मिक कार्यक्रमाची परंपरा आहे. यामध्ये तब्बल 20 वर्षांपासून हरिनाम सप्ताह केला जात आहे. यावेळी सात दिवस प्रवचन, व्याख्यानाचे आयोजन केले जाते. ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित असता. गेल्या 18 वर्षापासून आषाढी एकादशीदिवशी कोल्हापूर ते नंदवाळ असा अखंड पायी दिंडी सोहळा सुरु आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून 12 लाखांच्या निधीतून चांदीचा रथ करण्याचे काम दसऱ्यापासून सुरू होणार आहे. यंदा भव्य रथातून पालखीमधून बाप्पांचे आगमन झाले.
जयशिवराय तरूण मंडळाचे वैशिष्टे
मंडळाची स्थापना -1970
पालखीतून गणेशोत्सव सुरू -1994
गणेशमूर्तीची उंची-सव्वा दोन फुट
चांदीच्या पालखीतून श्रीचे आगमन विसर्जन
गेल्या 25 हून अधिक वर्षापासून हरिनाम सप्ताह
18 वर्षापासून नंदवाळ पायी दिंडी सोहळा
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा येथून पुढे सुरू ठेऊ
मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार 1994 पासून मंडळाने पालखीतून गणेशमूर्ती आणणे आणि विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून आजपर्यंत सलग 29 वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. येथून पुढेही पंरपरा कायम ठेवणार आहे.
बाळासाहेब पोवार, अध्यक्ष, जयशिवराय तरूण मंडळ