सर्वच तालुक्यात जुने-नवे असा वाद उफाळला; संघटना बळकटीकरणाऐवजी दुफळी झाल्याचे चित्र; संघटनेतील वाद पेल्यातील वादळ ठरणार काय ?
कृष्णात चौगले कोल्हापूर
भाजप हा राज्य आणि केंद्रात सत्तेवर असणारा एक प्रमुख पक्ष. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निर्विवाद यश मिळवल्यानंतर आता पुन्हा 2024 च्या लोकसभा निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळवण्याचा भाजपने चंग बांधला आहे. त्यासाठी भक्कम संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाने कंबर कसली आहे. पण कोल्हापूर जिह्यातील चित्र पाहता जिल्हा व तालुका कार्यकारीणी निवडीतून दुफळी निर्माण झाली आहे. संघटनेचा गड मजबूत करण्यासाठी निघालेल्या भाजपचे बुरुज ढासळत चालले आहेत.
कार्यकारिणी निवड प्रक्रियेमध्ये वर्षानुवर्षे राबलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच डावलल्यामुळे त्यांनी बंडाची भूमिका घेतली आहे. आजरा तालुक्यात याबाबतचा भूकंप झाला असला तरी त्याचे हादरे मात्र जिल्हाभर बसत आहेत. लवकरच नाराज कार्यकर्त्यांचा कोल्हापूरात भव्य मेळावा होणार असून तालुका व जिह्यातील नवीन कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी केली जाणार आहे.
भाजप पक्षाची एक स्वतंत्र विचारधारा आहे. त्यामुळेच हा पक्ष सत्तेत असो अथवा नसो. या विचाराशी बांधिल असलेल्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून ‘कमळ’ हे चिन्ह जिवंत ठेवले आहे. पण नविन कार्यकारिणीमध्ये निवड केलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजपचा मूळ अजेंडा तळागाळापर्यंत रुजवला जाणार काय ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बंड करून आपली नाराजी व्यक्त केली. हा तालुका असंतोषाचा केंद्रबिंदू ठरला असला तरी त्याचे हादरे टप्प्याटप्प्याने जिल्हाभर बसत आहेत. गडहिंग्लज, शिरोळ, चंदगड, पन्हाळा, करवीरसह कोल्हापूर शहरात देखील धुसफुस सूरु आहे. तर बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यातील नाराजी उघड केली जाण्याची शक्यता आहे. परिणामी या जुन्या-नव्याच्या वादात विचारधारेशी एकनिष्ठ असलेला भाजप कार्यकर्ता पक्षापासून दुरावला जाण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हा भाजपमुक्त झाला. आता आगामी निवडणुकीत भाजपला निर्विवाद यश मिळवण्यासाठी मजबूत संघटना बांधणीचे आव्हान आहे.
नाराजांचा लवकरच कोल्हापूरात मेळावा
भाजपमधील शहर व जिह्यातील नाराज कार्यकर्ते एकत्र येणार असून लवकरच त्यांचा कोल्हापूरात मेळावा होणार आहे. यामध्ये त्यांच्याकडून नवीन कार्यकारिणी रद्द करण्याची मागणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी पक्षातील जुनी नेतेमंडळी उपस्थित राहणार असून पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. दरम्यान कार्यकर्त्यांची ही नाराजी कायम राहणार की संघटनेतील हा वाद पेल्यातील वादळ ठरणार हे आगामी काळा स्पष्ट होणार आहे.
चंद्रकांत दादा गप्प का ?
जिह्यात गेल्या दोन महिन्यांपासून भाजपच्या संघटनात्मक पातळीवर वादविवाद सुरु आहे. अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तर जाहीर नाराजी व्यक्त करून आम्ही दाद कोणाकडे मागायची ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सद्यस्थितीत महाडिक कुटूंबाच्या भोवती जिह्यातील भाजपची परिसीमा निश्चित झाली आहे. खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांना पक्षात प्रमुख स्थान आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमधील नाराजांची मनधरणी करणे कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. पण ते आजतागायत झाले नाही. या सर्व नाराजीनाट्याच्या घडामोडीमध्ये भाजपचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी आजतागायत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी मौन बाळगल्यामुळे भाजपमधील अनेक जुने, जाणते कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले जाण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पुढील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर
नवीन कार्यकारिणी निवडीच्या माध्यमातून जिह्यातील नाराज झालेल्या जुन्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीची पुढील दिशा ठरविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 5 व 6 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामध्ये सर्व तालुक्यातील नाराज कार्यकर्ते नवीन कार्यकारिणी निवडी रद्द करण्याची मागणी करणार आहेत.
नाकापेक्षा मोती जड
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरातील कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कामाच्या पद्धतीवर भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज आहेत. दादांच्या आजूबाजूला असलेल्या चौकडीवर देखील कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे आमदार पाटील यांचे काम उल्लेखनीय असले तरी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि भोवतालच्या कार्यकर्त्यांमुळे त्यांच्यापासून अनेक कार्यकर्ते दुरावण्याचा धोका आहे.