एकुण रूग्ण 19 हजार 984, मृतांची संख्या 640, बरे होण्याचे प्रमाण 19.2 टक्के
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात कोरोना
रूग्णांची संख्येत वाढत असताना दुसरीकडे रूग्ण बरे होण्याचे
प्रमाणही अधिक असल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीवरून बुधवारी
स्पष्ट झाले. मागील 24 तासांमध्ये 1383 नवीन रूग्ण आढळले. त्यामुळे रूग्णसंख्या 9 हजार
984 झाली तर आतापर्यंत 3 हजार 869 रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत.
बुधवारी 24 तासांमध्ये 1383 नवीन रूग्ण आढळले. तर 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकुण रूग्णांमध्ये 77 विदेशी नागरिक आहेत. अद्याप 15 हजार 474 रूग्णांवर उपचार सुरू असून संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूने भारताता आतापर्यत 640 बळी घेतले आहेत. देशाचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक 251 रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
आरोग्य मंत्रालयाकडून माहिती आता आठवडय़ातून चार दिवस
देशातील कोरोना विषाणू संसर्गाबाबतची माहिती दररोज सायंकाळी चार वाजता आरोग्य मंत्रालयाच्या वतीने माहिती देण्यात येत होती. आता ती आठवडय़ातून चार दिवस दिली जाईल, अशी माहिती बुधवारी सूत्रांनी दिली. आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठी केंद्रीय समितीची स्थापना केली आहे. यामध्ये आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांचाही समावेश आहे. या समितीवर कोरोनावर नियंत्रणाची मुख्य जबाबदारी असेल. अग्रवाल हे दररोज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषदेमध्ये देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देत असत. आता ही माहिती आठवडय़ातून चार दिवस मिळेल. तसेच आरोग्य मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती पत्रकाव्दारे दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
10 हजारवरून 20 हजार 8 दिवसांमध्ये
भारतात कोरोना रूग्णांच्या संख्येने 20 हजाराचा आकडा गाठला आहे. 10 हजारांवरून 10 हजारांवर जाण्यासाठी 8 दिवस लागले. मात्र, तरीही रूग्णवाढीचा वेग तुलनात्मकदृष्टय़ा कमी होत आहे. भारतात रूग्णसंख्या 10 वरून 100 होण्यासाठी आठ दिवस, 100 वरून 1000 होण्यासाठी पुढचे आठ दिवस, 1000 वरून 10 हजार होण्यासाठी त्यापुढचे आठ दिवस लागले होते. या हिशेबाने त्या पुढच्या आठ दिवसांमध्ये रूग्णसंख्या 1 लाखापर्यंत जाईल असे अनुमान होते. मात्र, या आठ दिवसांमध्ये रूग्णसंख्या 20 हजारांपर्यंत पोहचली आहे. याचाच अर्थ रूग्णसंख्येची वाढ दहाच्या पटीत होत नसल्याचे आणि वाढीचा वेग स्थिरावल्याचे दिसत आहे. इतर प्रगत कोरोनाग्रस्त देशांच्या तुलनेत त्यामुळेच भारताची स्थिती अद्याप बरी असल्याचे दिसते. याचे श्रेय लॉकडाऊनला द्यावे लागते, असे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
चाचण्यांची संख्या महत्वहीन
‘लॉकडाऊन’ला फारसे महत्व नाही. त्याऐवजी जास्तीत जास्त चाचण्या केल्या पाहिजेत, अशा अर्थाचे मत काँगेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच व्यक्त केले होते. त्यावर बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. मात्र जास्त चाचण्या केल्याने कोरोना नियंत्रणाखाली येईल ही संकल्पना दिशाभूल करणारी आहे, अशी स्पष्टोक्ती जागतिक कीर्तीचे डॉक्टर श्रीनाथ रेड्डी यांनी केली आहे. रेड्डी हे जागतिक आरोग्य संघटनेच्या महत्वपूर्ण संस्थेचे सल्लागार आणि सदस्यही आहेत. अधिक चाचण्यांचे तर्कशास्त्र त्यांनी व्यवस्थिती आणि पुराव्यानिशी खोडून काढले आहे. केवळ चाचण्या अधिक केल्याने आपण रूग्णांचा मृत्यू टाळू शकतो हे खरे नाही. तसेच चाचण्या कमी केल्या म्हणून रूग्णांची जीवीतहानी अधिक होते हे देखील असत्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी विविध देशांची तुलनात्मक आकडेवारी मांडून निर्विवादपणे सिद्ध केले आहे. त्यामुळे अधिक चाचण्यांचे तर्कशास्त्र संदर्भहीन ठरल्याचे दिसते.