नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह 50 काँगेस नेत्यांनी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ काँगेस पक्षाचा त्याग केला आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांना संयुक्त त्यागपत्र पाठविले आहे. माजी मंत्री अब्दुल मजीद वाणी, मनोहर लाल शर्मा, घरु राम आणि विधानसभेचे माजी सदस्य बलवान सिंग यांचा त्यागपत्र दिलेल्या नेत्यांमध्ये समावेश आहे. हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे.
गुलाम नबी आझाद यांनीही गेल्या शुक्रवारी काँगेस पक्षाचा त्याग करुन खळबळ उडवून दिली होती. त्यापाठोपाठ आता 50 नेत्यांनी राजीनामा दिल्याने काँगेस पक्षाची अपरिमित हानी होणार आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. काँगेसशी असणारा आपला 50 वर्षांचा संबंध तोडताना आझाद यांनी काँगेस नेत्वृत्वावर कडवट टीका केली होती. त्यामुळे काँगेसने त्यांच्यावर ते भाजपचे हस्तक बनल्याचा आरोपही केला होता. गेले चार दिवस आझाद आणि काँगेस यांच्यात शब्दद्वंद्व पेटलेले दिसून येत आहे.
नवा पक्ष स्थापन करणार
गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरमध्ये नवा पक्ष स्थापन करणार आहेत. या पक्षाची स्थापना लवकरच केली जाईल, असे त्यांच्या समर्थकांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिलेले नेते या नव्या पक्षात प्रवेश करतील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक प्रबळ प्रादेशिक पक्ष निर्माण होण्याची शक्यता राजकीय तज्ञ व्यक्त करीत आहेत.