‘लीड स्कूल’ सर्वेक्षणाचा निष्कर्ष
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सध्या देशातील सर्वात मोठी ‘ऑनलाईन शाळा’ चालवत असलेल्या ‘लीड स्कूल’मार्फत केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये कोविड आजाराच्या साथीमुळे शिशु वर्गांपासून बारावीपर्यंतच्या मुलांच्या पालकांना खूप मोठी चिंता भेडसावू लागल्याचे समोर आले आहे. कोविड साथीच्या काळात समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या स्थितीमुळे आपल्या मुलांच्या भविष्याबाबत ८५% पेक्षा जास्त पालक चिंतित असल्याचे याबाबतच्या अहवालात म्हटले आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर हे सर्व्हेक्षण करण्यात आले. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आपल्या देशात ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे, असेही यातून दिसून आले आहे. महाराष्ट्रातील ५०% पेक्षा जास्त पालक असे मानतात की ऑनलाईन शाळा हा शिक्षणाचा प्रभावी मार्ग आहे आणि शाळेच्या वर्गांमध्ये बसवून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबरोबरीनेच ऑनलाईन शिक्षण देखील सुरु ठेवले गेले पाहिजे. जवळपास ५३% पालक असे मानतात की, ते आपल्या मुलांना घरून चालणाऱ्या ऑनलाईन शिक्षणात मदत करू शकतात, आई आणि वडील दोघांनीही हे मत व्यक्त केले आहे.
महानगरे आणि इतर शहरांमधील जवळपास ५००० पालकांसोबत केल्या गेलेल्या या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणातून काही वास्तविक परंतु कठोर निष्कर्ष आढळून आले आहेत. ७०% पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर कोविडमुळे होत असलेल्या प्रभावामुळे खूप काळजीत आहेत. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक थोडे जास्त चिंतीत झाले आहेत; सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांपैकी ७८% पेक्षा जास्त पालकांना आपल्या मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत चिंता वाटत आहे; आणि जवळपास ४०% पालकांनी त्यांची मुले अभ्यासात मागे पडतील आणि त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दलची भीती तसेच मुले अभ्यासात मागे पडतील आणि त्यांचे शिक्षणाचे एक वर्ष वाया जाईल, या दोन सर्वात मोठ्या चिंता महाराष्ट्रातील पालकांनी व्यक्त केल्या आहेत.लीड स्कूलकडे असलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरयाणामधील पालक असे मानतात की ते आपल्या मुलांना शिक्षणात मदत करण्यात चांगल्या प्रकारे सक्षम नाहीत. तर दुसरीकडे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगाणा येथील पालक मानतात की, ते आपल्या मुलांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी सक्षम आहेत.
सर्वेक्षणातून आढळून आलेली ही बाब आश्चर्यजनक नाही, की महाराष्ट्रातील ८४% पालक म्हणतात, ते आपल्या मुलांसोबत जास्त चांगल्या प्रकारे वेळ घालवण्यात सक्षम आहेत – मोठ्या आणि छोट्या दोन्ही प्रकारच्या शहरांमध्ये ही बाब आढळून आली आहे. भारतातील पालकांना भेडसावत असलेल्या मुख्य चिंता समजून घेणे हे या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणाचे उद्धिष्ट होते. यामध्ये सहभागी झालेल्या पालकांनी कोविड-१९ मुळे शाळा बंद असल्याच्या समस्येला सामोरे जात असतानाचे आपले अनुभव यामध्ये मांडले आहेत, त्यासोबत मुलांच्या बाबतीत त्यांच्या निर्णयांवर सद्यस्थितीचा कसा प्रभाव होत आहे, हेदेखील त्यांनी सांगितले आहे.
लीड स्कूलचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता यांनी सांगितले की, “आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांच्या मनात जी भीती आहे ती मी समजू शकतो. आपल्या शाळांनी उच्च गुणवत्तापूर्ण ऑनलाईन शिक्षण अनुभव प्रदान करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून जर आपण आपल्या मुलांना शाळांमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेत असू तर त्यांचे काही नुकसान होणार नाही. पण त्याचवेळी आपल्याला अशा पालकांच्या निर्णयाचा देखील आदर राखावा लागेल जे आपल्या मुलांना शाळेत पाठवू इच्छित आहेत. शाळांमध्ये नियमांचे पालन होत आहे याची खात्री करून घेण्यासाठी सरकारने नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे आणि ज्या शाळा नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली गेली पाहिजे. कारण पालक आणि विद्यार्थी या दोघांच्याही मनात विश्वास निर्माण करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. पालकांनी या पर्यायाचा वापर करायला हवा आणि शाळांसोबत सहकार्य आणि समन्वयाने पुढे गेले पाहिजे कारण पालक आणि शाळांदरम्यानचे विश्वासार्ह संबंधच कोविड-१९ ला भारतीय शिक्षण क्षेत्रासाठी सर्वात मोठी भेट बनवू शकतील.”