पुणे / प्रतिनिधी :
यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या 95 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्दता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. जून-जुलै महिन्यात कमी पाऊस होईल आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडेल. कमी दिवसांत अधिक पावसाचेही प्रमाण वाढणार आहे. विदर्भात मात्र शंभर टक्के पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
डॉ. साबळे गेल्या 20 वर्षांपासून पावसाचा अंदाज देत आहेत. ते म्हणाले, मी माझे स्वत:चे एक मॉडेल तयार केले आहे. त्यामध्ये स्थानिक पातळीवरील हवामानानार अंदाज देतो. त्यामुळे ते बरोबर ठरतात. यंदा कमी पाऊस पडणार आहे. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, जळगाव, राहुरी, कराड, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही (चंद्रपूर) या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडेल, तर दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहणार आहे. हवामान बदलामुळे पावसावरही परिणाम होत आहे. जागतिक तापमान वाढत असल्याने समुद्रातील तापमानावरही फरक पडत आहे. येत्या 2030 पर्यंत तापमानात 2 अंशाने वाढ होणार आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसेल.