आजी-माजी खेळाडूंकडून केन विल्यम्सन व किवीज संघसहकाऱयांचे अभिनंदन, विजेत्या न्यूझीलंडला 12 कोटी तर उपविजेत्या भारताला 6 कोटी रुपयांचे इनाम
वृत्तसंस्था /साऊदम्प्टन
एकीकडे भारतीय सुपरस्टार खेळाडू आणि दुसरीकडे ऑफसिझनमध्ये गुजराण करण्यासाठी कॅनी ऑपरेटर बनणारे न्यूझीलंडचे क्रिकेटपटू यांच्यात रंगलेल्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप लढतीत बाजी मारणाऱया न्यूझीलंड क्रिकेट संघावर जागतिक क्रिकेट वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. न्यूझीलंडसाठी आयसीसी क्रिकेट स्पर्धांमधील हे सर्वात प्रतिष्ठेचे विजेतेपद असून यापूर्वी 2000 साली आयसीसी चॅम्पियन्स चषकावर त्यांनी आपले नाव कोरले होते. ती स्पर्धा नैरोबी येथे झाली होती.
बुधवारी कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या राखीव सहाव्या दिवशी रॉस टेलर व कर्णधार केन विल्यम्सन हिंमतीने लढले आणि त्यांनी संघाला 8 गडी राखून विजय संपादन करुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला. न्यूझीलंडचा संघ यापूर्वी 2015 व 2019 आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र, या दोन्ही वेळा त्यांना चषकाने हुलकावणी दिली होती.
सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात सर्वाधिक यशस्वी ठरत आला असून ते कसोटी व वनडेमध्ये अव्वलस्थानी तर टी-20 क्रिकेटमध्ये तिसऱया स्थानी विराजमान आहेत.
‘न्यूझीलंड संघ अधिक तळमळीने, अधिक बांधिलकीने खेळला. ‘इगो-फ्री क्रिकेट’ हे या संघाच्या खेळाचे मुख्य वैशिष्टय़ ठरले. खऱया अर्थाने ते विश्वचषक विजयाचे हकदार ठरतात’, असे गार्डियन या प्रतिष्ठेच्या दैनिकाने आवर्जून नमूद केले. किवीज फलंदाज मार्टिन गप्टील, माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिस, ग्रँट इलियॉट यांनी संघाच्या कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शिवाय, या विजयाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे अधोरेखित केले.
सचिन तेंडुलकरने देखील न्यूझीलंड संघाचे अभिनंदन केले आणि भारतीय संघाच्या कामगिरीमुळे निराशा झाली असल्याचे ट्वीट केले. ‘पहिली 10 षटके अतिशय महत्त्वाची होती आणि कोहली-पुजारा अवघ्या 10 चेंडूंच्या अंतरातच बाद झाल्याने भारतावर दडपण आले’, याचा सचिनने येथे उल्लेख केला. ‘2 वर्षांपूर्वी इंग्लिश भूमीतच विश्वचषक जिंकू न शकलेल्या किवीज संघाने आता इंग्लिश भूमीतच विश्वचषक जिंकला. त्यांचे खास अभिनंदन’, असे सेहवाग म्हणाला. या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात विराटचा बळी घेणाऱया काईल जेमिसनवरही अनेकांनी कौतुकाची बरसात केली. ‘दोन्ही देशांमध्ये दरडोई उत्पन्न आणि लोकसंख्या या निकषावर जमीन-अस्मानाचा फरक आहे. पण, क्रिकेटच्या मैदानावर भारतीय सुपरस्टार्सवर मात करण्यात न्यूझीलंडचा संघ यशस्वी ठरला’, असे वर्णन द टेलिग्राफ दैनिकाने केले.
माझ्या कारकिर्दीतील हा सर्वोच्च क्षणः रॉस टेलर
‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली, हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण आहे’, अशी भावूक प्रतिक्रिया न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलरने व्यक्त केली. 2006 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱया रॉस टेलरने या निर्णायक लढतीत 47 धावांची नाबाद खेळी साकारली. शिवाय, कर्णधार केन विल्यम्सनसमवेत तिसऱया गडय़ासाठी 96 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.
बीजे वॅटलिंगच्या कारकिर्दीची विजयी सांगता
न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज बीजे वॅटलिंगच्या कारकिर्दीची या चॅम्पियनशिपसह विजयी सांगता झाली. आपण वर्ल्डकप फायनलनंतर निवृत्त होत असल्याचे त्याने यापूर्वीच जाहीर केले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱया संघात आपण असू, अशी मी कल्पनाही केली नव्हती, अशी प्रतिक्रिया त्याने येथे व्यक्त केली.
न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील हा सर्वोत्तम दिवस ठरला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल अतिशय रोमांचक स्वरुपाची होती. अव्वल दर्जाच्या भारतीय संघाला नमवत आपल्या संघाने जागतिक क्रिकेटमधील पॉवरहाऊसमध्ये आपलाही समावेश होतो, हे दाखवून दिले आहे.
-न्यूझीलंडचे माजी कसोटीवीर सर रिचर्ड हॅडली
विल्यम्सन म्हणाला, आमच्याकडे स्टार खेळाडू नाहीत, उपलब्ध खेळाडूंना घेऊन खेळलो!
‘वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणे हा अतिशय खास अनुभव आहे आणि आम्ही या विश्वचषक विजयामुळे रोमांचित झालो आहोत. अर्थात, आमच्याकडे स्टार खेळाडू नाहीत, याची आम्हाला यापूर्वीच कल्पना होती. तरीही जे उत्तम खेळाडू आहेत, त्यांना सोबत घेऊन आम्ही खेळलो आणि विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरलो’, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने व्यक्त केली.
‘मागील 2 वर्षांपासून आम्ही जवळपास 22 खेळाडू विविध सामन्यांसाठी एकत्रित होतो. साहायक पथकातील सहकारी, अन्य संलग्न घटक विविध स्तरावर अविश्रांत मेहनत घेत होते आणि या यशाचे श्रेय या सर्वांना जाते’, याचा विल्यम्सनने येथे उल्लेख केला.
नामुष्कीजनक पराभवानंतर कोहली काय म्हणाला?
1) फायनल बेस्ट ऑफ थ्री असावी, एकाच लढतीवर निकाल नको…
‘जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कसोटी संघ कोणता, हे निश्चित करण्यासाठी केवळ एकच फायनल खेळवण्याऐवजी बेस्ट ऑफ थ्री फायनल खेळवणे आवश्यक आहे’, असे भारतीय कर्णधार विराट कोहली पराभवाचे विश्लेषण करताना म्हणाला. 3 सामन्यांची कसोटी मालिका असती तर त्यात दोन्ही संघांच्या ताकदीला वाव मिळू शकला असता, असे कोहलीचे मत आहे.
2) कसोटी संघात व्यापक फेरबदल करावे लागणार
‘आमच्या बऱयाच खेळाडूंनी धावा करण्यासाठी बाजी लावली नाही, असे प्रथमदर्शनी दिसून आले. असे तोटे टाळण्यासाठी भविष्यात कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी योग्य अशा खेळाडूंनाच संधी देणे महत्त्वाचे ठरेल’, असे विराट कोहली कोणत्याही खेळाडूचे नाव न घेता म्हणाला. या लढतीत अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात 54 चेंडूत केवळ 8 धावा केल्या आणि यातील पहिली धाव घेण्यासाठी 35 चेंडू खर्ची घातले. नंतर दुसऱया डावातही त्याने 80 चेंडूत 15 धावा केल्या.
3) रिषभ पंतचा आक्रमक पवित्रा योग्यच…
यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत यश मिळत नसताना देखील सातत्याने पुढे सरसावून फटके मारण्याचा प्रयत्न करताना दिसून आला आणि याच प्रयत्नात दुसऱया डावात त्याने आपली विकेटही बहाल केली. मात्र, कोहलीला त्याच्या पवित्र्यात काहीही गैर वाटत नाही. ‘रिषभ हा माझ्या दृष्टीने एक्स्प्रेसिव्ह खेळाडू आहे. आता कोणत्याही खेळाडूचा अंदाज चुकू शकतो आणि खेळात ही बाब स्वीकारावी लागते’, असे कोहली म्हणाला.