मुख्य जिल्हासत्र न्यायालयाने काढला आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे खटले चालतात. या खटल्यांसाठी पक्षकार व त्यांचे वकील मूळप्रती देत असतात. निकाल लागल्यानंतर त्या मूळप्रती बरेच जण घेऊन जात नाहीत. मात्र आता डिसेंबर 2014 पर्यंत ज्या खटल्यांचा निकाल लागला आहे त्या संबंधित फौजदारी आणि दिवाणी खटल्याच्या पक्षकार व वकिलांनी आपल्या मूळ प्रती घेऊन जाव्यात, असे आवाहन मुख्य जिल्हासत्र न्यायालयाने केले आहे.
खटले निकालात लागल्यानंतर बरेच दिवस ही कागदपत्रे मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या कार्यालयामध्ये जपून ठेवली जातात. त्यामध्ये खरेदी-विक्रीच्या मूळ प्रती, डायरी-उतारे याचबरोबर इतर कागदपत्रे त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. तेव्हा डिसेंबर 2014 पर्यंत ज्यांचे खटले निकालात लागले आहेत, उच्च न्यायालयात अपिल करण्यात आले नाही त्या सर्वांनी सात दिवसांच्या आत घेऊन जावीत. अन्यथा ती कागदपत्रे नष्ट करण्यात येतील, असे कळविण्यात आले आहे. फौजदारी किंवा दिवाणी तसेच इतर खटल्यांतील ही सर्व कागदपत्रे आहेत. मूळ प्रती असल्यामुळे कोणत्या तरी कामासाठी ती लागणार आहेत. तेव्हा पक्षकारांनी संबंधित वकिलांकरवी कागदपत्रे आपल्या ताब्यात घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.