प्राचीन काळी एका राज्यात सुगंधी पाणी मिळत असे अशी प्रसिद्धी संपूर्ण विश्वात झाली. जगभरातील सगळय़ाच लोकांना आश्चर्य वाटायला लागले. पाणी सुगंधी कसे असेल हा प्रश्न लोकांना पडायला लागला. काही लोकांना ही शून्य श्रद्धा वाटायला लागली तर काही लोकांमधील कुतूहल जागृत झाले. जगभरातील विद्वानांना सुगंधी पाण्याविषयी जिज्ञासा वाटू लागली. हे सुगंधी पाणी ज्या राज्यात मिळत असे तेथील राजाला किंवा राणीला याविषयी काहीही माहीत नव्हते. तसेच राजाचे मंत्रिमंडळ, सैन्य आणि प्रजादेखील याबाबत अनभिज्ञ होती. जगभरातील राज्यांनी राजाला सुगंधित पाणी देण्याची मागणी केली अन्यथा राज्यावर हल्ला केला जाईल अशी धमकी दिली. राजाने त्या राज्यांना एका वर्षाच्या आत सुगंधी पाणी मिळवून देण्याची खात्री दिली. राजाने संपूर्ण राज्याला आदेश दिला की, ‘आपल्या राज्यातील सुगंधी पाण्याचा शोध लावावा.’ त्याप्रमाणे, संपूर्ण सैन्य आणि प्रजाजनांनी शोध घेण्यास सुरुवात केली. एक महिना झाला पण सुगंधी पाणी काही केल्या मिळेना. राजाने एक वर्षाची मुदत दिली आणि पाणी शोधण्यास सांगितले. राज्यातील जनतेच्या मनात सतत सुगंधी पाण्याचेच विचार येऊ लागले. काहीजण पाण्याचा वापर करताना पाण्याला सुगंध येतो आहे का याची खात्री करू लागले तर काही जण आमच्या राज्यात सुगंधी पाणी मिळते आहे याची जाहिरात करू लागले. या सुगंधी पाण्याचा शोध घेता घेता एक वर्ष संपायला आले. पण सुगंधी पाणी काही मिळेना. जर सुगंधी पाण्याचा शोध लागला नाही तर राजा आपल्याला शिक्षा करेल ही भीती प्रजेला वाटू लागली. एका वर्षाची राजाने दिलेली मुदत संपली पण सुगंधी पाण्याचा शोध काही केल्या लागला नाही. राजाने सर्व प्रजाजनांना एके दिवशी मोठय़ा मैदानात उपस्थित राहण्याची आज्ञा दिली. सैन्याला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यास सांगितला. प्रजेच्या, सैन्याच्या आणि मंत्रिमंडळाच्या मनात नेमके काय घडेल याविषयीची भीती वाढू लागली. राजा आपल्याला शिक्षा करणार तर नाही ना या भीतीमुळे मैदानातील सगळेच लोक रडायला लागले. एकमेकांना आधार देऊ लागले. अचानक राजा तेथे त्याच्या कुटुंबासहित पोहोचला. त्याचे कुटुंबीयसुद्धा राजा या मैदानातील सैन्याचे आणि प्रजेचे काय करेल या भीतीनेच रडू लागले. राजाने इतर राज्यातील प्रतिनिधींनाही बोलावले. राजाने संपूर्ण मैदानावर नजर टाकली. त्याच्या प्रजेचे एकमेकांवरील प्रेम पाहून त्याचे डोळे पाणावले आणि तो प्रजेला म्हणाला की, ‘तुम्हाला सुगंधी पाणी हवे होते ना, तुमचे एकमेकांवरील प्रेम, आपुलकी यामुळे तुमचे डोळे भरून आले आहेत. तुमच्या डोळय़ातील पाणी म्हणजेच सुगंधी पाणी आहे.’ इतर राज्यांतील प्रतिनिधींना सुगंधी पाणी म्हणजे काय हे समजले आणि ते आपापल्या राज्यात परतले. तेथील राज्यकर्त्यांना त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आणि असे सुगंधी पाणी आपल्या राज्यातही निर्माण करता येऊ शकते परंतु याकरिता तसे नेतृत्व आवश्यक आहे हे पटवून दिले.
ज्या राज्याचे नेतृत्व स्वतःविषयी कठोर असते पण प्रजेविषयी मृदू असते तेथे असे सुगंधी पाणी नेहमीच अनुभवायला येते. सुगंधी पाणी हे प्रतीकात्मक आहे. पाण्याला रंग, रूप, गंध नसतो पण भावना आणि संवेदना असतात. तसेच व्यवस्थापन शास्त्रालासुद्धा भावना आणि संवेदना असतात. दृश्य जगतात जरी व्यवस्थापनशास्त्र दिसत नसले तरीही त्याचा साक्षात्कार मात्र होत असतोच. व्यवस्थापन शास्त्रातील नेतृत्व जर कणखर, मृदू, विचारी, विवेकी आणि प्रभावशाली असेल तर व्यवस्थापनशास्त्राचे अदृश्य स्वरूप त्यास समजू शकते. नेतृत्व कसे असावे याविषयी श्रीसमर्थ रामदासस्वामी असे म्हणतात की,
शरीर परोपकारी लावावें । बहुतांच्या कार्यास यावें ।
उणें पडों नेदावें ।कोणियेकाचें ।।आडलें जाकसलें जाणावें ।यथानशक्ती कामास यावें ।मृदवचने बोलत जावें ।कोणियेकासी ।। 05-06/10/12
म्हणजे, शरीर परोपकारी लावावे. अनेकांच्या कामी यावे. कोणाचेही उणे पडू देऊ नये. जो अडला असेल त्याला ओळखावे आणि जो गांजला असेल त्याचे दुःख समजून घ्यावे. मृदू शब्दांनी बोलावें.
व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्वाची हीच कार्ये असतात. जो/जी सर्वोत्तम व्यवस्थापक असतो तो/ती इतर सहकाऱयांना समजून घेत असतात. त्यांच्या अडीअडचणींना जाणून घेऊन संस्थेला पुढे नेण्याची त्यांची वृत्ती असते. श्रीसमर्थांनी सामान्य व्यवस्थापक उत्तम कसा होऊ शकेल हेच या ओव्यांमधून दर्शवून दिले आहे. श्रीसमर्थ उत्तम व्यवस्थापक हा सर्वोत्तम व्यवस्थापक कसा होऊ शकेल याविषयी असे सांगितले आहे की,
बहुतांचे अन्याये क्ष्मावे ।बहुतांचे कार्यभाग करावे ।
आपल्यापरीस व्हावे ।पारखे जन ।।दुसऱयाचें अंतर जाणावें ।तद्नुसारचि वर्तावें ।लोकांस परीक्षित जावें ।
नाना प्रकारें ।। 08-09/10/12
याचा अर्थ असा की, ‘पुष्कळांच्या अन्यायाला क्षमा करावी. अनेक लोकांना त्यांच्या कार्यात मदत करावी. परक्मयांना आपलेसे करवून घ्यावे. इतरांच्या मनातील ओळखून त्याप्रमाणे आपले धोरण ठरवावे. अनेक प्रकारे लोकांची परीक्षा करावी.
व्यवस्थापनशास्त्रातील व्यवस्थापकीय गुणात या गोष्टींचा अंतर्भाव होतो. संस्थेत अनेक प्रकारच्या छोटय़ा-मोठय़ा चुका होत असतात पण त्याकडे दुर्लक्ष करूनच व्यवस्थापकाने वागावें. जे विरुद्ध मतावलंबी आहेत त्यांना आपलेसे करून घ्यावे. श्रीसमर्थांनी सर्वोत्तम व्यवस्थापक उत्तम नेतृत्व कसे करू शकेल याविषयी असे सांगितले आहे की,
नेमकेचि बोलावें ।तत्काळचि प्रतिवचन द्यावें ।कदापि रागास न यावें ।क्षमारूपें ।।मरणाचे स्मरण असावें ।हरीभक्तीस सादर व्हावें ।मरोन कीर्तीस उरवावें ।येणें प्रकारें ।। 10-13/10/12
याचा अर्थ असा की, जेवढी गरज आहे तेवढेच बोलावे. प्रश्न विचारल्यास तत्काळ उत्तर द्यावे. क्षमाशील असावे. कधीही रागावू नये. मरणाचे सदैव स्मरण असावे. हरिभक्तीला नेहमीच तयार रहावे. अशा पद्धतीने आयुष्य जगून आपण मेल्यावर आपली कीर्ती मागे राहू द्यावी.
श्रीसमर्थांनी उत्तम व्यवस्थापक, सर्वोत्तम व्यवस्थापक आणि सर्वोत्तम नेतृत्व कसे असावे याचे सुंदर विवेचनच श्रीमद् दासबोध या ग्रंथराजातून केले आहे. श्रीसमर्थ आणि त्यांचे अनेकानेक शिष्यमंडळीसुद्धा असेच सर्वोत्तम नेतृत्व असलेले होते.
आधुनिक काळात आपल्याला सर्वोत्तम नेतृत्व हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रात जाणवते. संपूर्ण विश्वात सनातन हिंदूधर्माचा विजयध्वज रोवूनही ते अतिशय नम्र, विशालहृदयी, प्रचंड तेजस्वी, राष्ट्रभक्त आणि सर्वार्थाने उत्तम पुरुष होते. ज्यांना व्यवस्थापनशास्त्रात सर्वोत्तम नेतृत्व बनायचे असेल त्याने/तिने स्वामी विवेकानंदांचे चरित्र सतत अभ्यासावे.
माधव किल्लेदार