955 जणांचा मृत्यू -अजूनही 4 लाख 85 हजार सक्रिय रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील कोरोनाची दुसरी लाट संथगतीने ओसरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात चोवीस तासातील नव्या रुग्णांचा आकडा 40 ते 50 हजारांच्या आसपास घुटमळत आहे. शनिवारच्या चोवीस तासात देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. मात्र मृत्यूंची संख्या वाढली आहे. 27 जूनपासून देशात सतत 50 हजारांहून कमी नवीन कोरोना रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, भारतात आतापर्यंत 35 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 41 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात कोरोनाचे 43 हजार 071 रुग्ण आढळले. याचदरम्यान 955 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देशात सलग 52 व्या दिवशी कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. शनिवारी दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 52 हजार 299 इतकी होती. बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाण नव्या बाधितांपेक्षा अधिक असल्याने सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली आहे. सध्या देशात 4 लाख 85 हजार 350 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
देशात आतापर्यंत 3 कोटी 5 लाख 45 हजार 433 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकंदर रुग्णांपैकी 4 लाख 2 हजार 5 जणांचा बळी गेला असून 2 कोटी 96 लाख 58 हजार 78 जणांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत 35 कोटी 12 लाख 21 हजार 306 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशभरात लसीकरण मोहीम मोठय़ा प्रमाणात वेग घेत असल्याचे दिसून येत आहे.