गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांत घबराहट, 2019ची पुनरावृत्ती, पर्यायी मार्गाचा प्रश्न ऐरणीवर
प्रतिनिधी/पन्हाळा
सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावासाने पन्हाळ्यासह परिसरात कहर केला आहे. पावसामुळे पावनगड येथील तटबंदी, तीन दरवाजा येथील रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यातच आज पहाटे पन्हाळगडाचा मुख्य मार्ग असलेला चार दरवाजा येथील रस्ता खचल्याने यात आणखी भर पडली आहे. या घटनेमुळे आँगस्ट 2019 साली पन्हाळ्याचा मुख्य मार्ग खचण्याची पुनरावृत्ती झाली आहे. यामुळे या मुख्य मार्गावरील वाहतुक पुर्ण बंद ठेवण्याचे आदेश तालुका प्रशासनाने दिले आहेत.
गेल्या तीन दिवसापासुन पन्हाळा तालुक्यात पावसाने अक्षरश:धुमाकुळ घातला आहे. पन्हाळ्याचा एकमेव असलेला मुख्य मार्गवरील चार दरवाजा येथील रस्ता दरीच्या बाजुला खचला. याठिकाणी गेल्या काही वर्षापुर्वी बांधण्यात आलेला संरक्षक कठडा जमिनदोस्त झाला आहे. या रस्त्याच्या दरीच्या बाजुकडील दोन वर्षापुर्वी तटबंदीची पडझड झाली होती.
आज पहाटे याच तटबंदीचे भुस्खलन झाले. त्यामुळे तटबंदीचे दगड, माती गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मंगळवारपेठ गावाच्या दिशेने वाहुन गेले. खालील बाजुचा आधार गेल्याने रस्ता देखील खचला. तटबंदी ढासळल्याने मंगळवारपेेठेतील अनेक घरांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान मंगळवारपेठ गावाला नदीनसुन देखील गडावरील पाणी खाली वाहत असल्याने महापुराचे चित्र तयार झाले आहे.
आँगस्ट 2019 ला मुख्य रस्ता खचल्यानंतर अंदाजे दोन कोटी वीस लाख रुपये खर्च करुन नउशे मीटरचा रस्ता दुरुस्त करण्यात आला. पण आज या घटनेमुळे तात्पुरती डागडुजी न करता या रस्त्यासाठी पर्याय शोधणे गरजेचे बनले आहे.
तीन दरवाजा रस्ता ही धोकादायक
पन्हाळ्याचा मुख्य मार्ग गतदोन वर्षापुर्वी खचल्याने पन्हाळकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यावेळी तीन दरवाजा येथीर रस्त्यावरुन दुचाकी वाहनाच्या वाहतुकीमुळे थोडा दिलासा मिळाला होता. पण तीनदरवाजा येधील रस्त्याला देखील मोठ्या प्रमाणात पडलेल्या भेगा व पाण्याच्या प्रवाहामुळे आलेले दगड गोठे रस्त्यावर येवुन पडले आहेत. त्यात पावसाचे प्रमाण पाहता जर तीन दरवाजा रस्ता बंद झाल्यास ,पन्हाळावासियांना नजरकैदेत राहुन पायपीट शिवाय पर्याय राहणार नाही.