मंदिरातील नित्योपचार उत्सव मूर्तीवर
कुरुंदवाड / रवींद्र केसरकर =–
श्री दत्तांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत गेल्या शेकडो वर्षांपासून अनेक रुढी परंपरा यांची प्रथा आजही जपली जाते. कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पावसामुळे वाढ झाली की प्रथम येथे श्रींच्या मनोहर पादुकावरून पुराचे पाणी गेले की दक्षिण द्वार होते. यानंतर श्रींची उत्सवमूर्ती नित्य उपचारासाठी श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात येते, तेथेही पुराचे पाणी आले की ही उत्सवमूर्ती टेंबे स्वामी मठात आणण्यात येते आणि या ठिकाणी ही पुराचे पाणी आले की त्या दिवशी जे पुजारी पूजेचे मानकरी असतील त्यांच्या घरी श्रींची उत्सव मूर्ती आणली जाते यालाच समस्त वाडीकर मंडळी’ उत्सवमूर्ती गावात आले असे संबोधतात.
चार दिवसांपूर्वी दक्षिणद्वार झाल्यानंतर श्री ची उत्सव मूर्ती नारायण स्वामी मठात ठेवण्यात आली यानंतर पुराचे पाणी वाढतच गेले. शनिवारी पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान नारायण स्वामी मठात पुराचे पाणी आल्याने श्रींची उत्सवमूर्ती कमरे एवढ्या पाण्यातून टेम्बे स्वामी मठामध्ये ठेवण्यात आली, शनिवारी पहाटे 5 च्या दरम्यान तेथेही पुराचे पाणी आल्याने श्रींची उत्सवमूर्ती परंपरेप्रमाणे आजच्या दिवसाची पूजेचे मानकरी अनंत दत्तात्रय पुजारी, विक्रांत हरी पुजारी यांच्या घरी सवाद्य मिरवणुकीने आणण्यात आली. यावेळी मिरवणूक मार्गावर अनेक सुवासिनींनी श्रींना औक्षण केले, तर पुजारी मंडळी सर्व भक्तांनी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती. एकीकडे देव गावात आल्याचा आनंद होता. मात्र दुसरीकडे 2019 प्रमाणे महापुराची धास्ती दिसत होती. श्रींच्या प्रतिष्ठापन नंतर मंदिरातील नित्योपचारस आला येथे सुरुवात झाली.
गेल्या तीन महिन्यापासून शासन आदेशानुसार दत्त मंदिर बंद असल्याने भक्तांना श्री चे दर्शन झाले नव्हते. आज शनिवारी श्रींच्या उत्सव मूर्तीच्या दर्शनाने भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.
दरम्यान कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून येथील बाजारपेठ बस स्थानक, भाजी मंडी परिसर, जुना औरवाड पूल परिसर, रामनगर, प्रबुद्ध नगर, वेद भवन परिसर यादव पूल परिसर आदी भागात पुराचे पाणी शिरल्याने येथील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. बाजारपेठ तसेच मुख्य मार्गावरील दुकानदारांनी आपली साहित्य ही सुरक्षित स्थळी नेऊन ठेवले आहे. असे असले तरी 2019 च्या महापुराच्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा तशीच स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण आहे.