सातारा / प्रतिनिधी :
अतिवृष्टीने दि. 22 रोजी वाई तालुक्यातील जोर येथे मोठी हानी झाली आहे. तरी देखील गेल्या पाच दिवसापासून प्रशासन तिकडे फिरकले नाही. जखमी झालेल्यांना मदतही मिळत नाही, अशी विचारणा वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी सोमवारी करताच दोघांमध्ये शाब्दीक चकमक रंगली.
प्रांताधिकाऱ्यांनी विराज शिंदे यांना माझं मी बघेन..नाहीतर तुम्हीच खांद्यावर घेवून जा, असे उत्तर दिल्यानंतर आक्रमक झालेल्या विराज शिंदे यांनी तुमची भाषा बरोबर नाही. गेले पाच दिवस येथे कोणी फिरकले नाही. अशा पद्धतीने प्रशासन जर दुजाभाव करत असेल तर अशा अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी केली. प्रशासनाला जर मदत करायला जमत नसेल तर आम्ही युवक काँग्रेसच्यावतीने जखमींना खासगी डॉक्टर आणून मदत करु. परंतु प्रशासनाचे हे वागणे बरे नाही, कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगिलते. तर वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापुरकर चौगुले यांनी आमच्याकडून मदत कार्य सुरु असल्याचे सांगितले.