मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांतील इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे संपुष्टात आले. ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे यासाठी सर्वपक्षीय नेते आग्रही आहेत. दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीचे पुन्हा आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर भाजपने ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका नकोत अशी भूमिका घेतली आहे. तसेच भाजपचे विधान परिषदेचरे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचा शोध घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करा अशा आशयाचे पात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे. त्यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाडळकरांवर जहरी टीका केली आहे.
भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या शोधाबाबत पत्रं लिहिलं आहे. त्यात हरवलेल्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचा शोध घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाडळकरांवर टीका करताना पडळकर हे अज्ञानी बालक आहेत. ते आता आता उगवलेलं गवत आहे. त्यांना काय माहीत आहे?, अशी जहरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना ही टीका केली. पडळकर हे अज्ञानी बालक आहेत. ते आता आता राजकारणात आले आहेत. ते नवीन उगवलेलं गवत आहेत. त्यांना अजून आपलं मूळ सापडलेलं नाही. अनेक ठिकाणी मूळ शोधून आलेला हा व्यक्ती आहे. ती कमिटी स्थापन करायचं काम मी केलं आहे. त्या पडळकरांना काय माहीत आहे?, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.