प्रतिनिधी/मुंबई
एकेकाळी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत दबदबा असलेल्या काँग्रेसचा प्रभाव आता कमी झाला आहे, काँग्रेसची अवस्था त्या जमीनदारांप्रमाणे झालीय ज्यांना आपली हवेलीही सांभाळता येत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मारला आहे.काँग्रेसने ही वस्तुस्थिती स्वीकारली तरच इतर विरोधी पक्षांसोबत त्यांचे संबंध चांगले राहतील असा सल्लाही त्यांनी दिला.
एका वृत्तपत्र समुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे तर या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पवारांच्या भुमिकेबाबत पुन्हा चर्चाचर्वण सुरु झाले आहे. पवारांनी काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर टिका केली आहे. `काँग्रेसने ज्यांना पॉवर दिली त्यांनीच त्यांनीच काँग्रेसचा घात केला’ असा प्रतिटोला त्यांनी राष्ट्रवादीसह पवार यांना मारला आहे.
पवार म्हणाले, काँग्रेसची आपल्या नेतृत्वाबाबत वेगळा विचार करण्यास तयारी नाही. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींना विरोधी पक्षांचा चेहरा करण्याची चर्चा सुरु असते तेव्हा काँग्रेसवाले म्हणतात की आमच्याकडे राहुल गांधी आहेत, अशी खोचक टिप्पण्णीही त्यांनी केली. राहुल गांधी यांच्याविषयी त्यांच्या पक्षातच काय मते आहेत हे सर्वजण जाणतात, याचीही आठवण करुन दिली.
शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
शरद पवारांना काँग्रेसच्या या भूमिकेमागचे कारण विचारले असता त्यांनी जमीनदारांचा एक किस्सा सांगितला. मी उत्तर प्रदेशातील जमीनदारांचा एक किस्सा ऐकला आहे, ज्यांच्याकडे मोठ-मोठÎा हवेल्या होत्या. जमीन सुधारणा कायद्यानंतर त्यांच्या जमिनी कमी झाल्या. पण हवेल्या तितक्याच मोठÎा राहिल्या. त्यांच्या शेतीतून येणारे उत्पन्न घटले. मग त्यांना आपल्या हवेलीच्या देखभालीचा खर्चही परवडेनासा झाला, आणि त्या हवेल्यांची रयाही गेली. इतकी तेथे कोणालाही बोलवणे म्हणजे आपल्याच हातून पंचनामा करण्यासारखी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसने ज्यांना `पॉवर’ दिली त्यांनीच घात केला
त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे, काँग्रेसने कधीही जमीनदारी केलेली नाही. काँग्रेस हा काही जमीनदाराचा पक्ष नाही. ज्या लोकांना काँग्रेसने पॉवर दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, हे सातत्याने देशभरातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, असा प्रतिटोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मारला आहे. सामान्य जनता आजही काँग्रेस सोबत आहे. देशामध्ये भाजपला एकच पर्याय तो म्हणजे काँग्रेसचा आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे पण या पद्धतीच्या प्रतिक्रिया देऊन काँग्रेस नेतृत्वाच्या खच्चीकरणाचा जो प्रयत्न केला जातो, हे आता कदापि कुणी मान्य करत नाही, काँग्रेस नेतृत्वचं 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान होईल, असा दावाही त्यांनी केला.