दीपक पवारांनी घेतली सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भेट,
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेत आजपर्यंत खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे या दोघा भावाभावाच्या आघाडय़ा राहिल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरात मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते आहेत. लोकांच्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल टाकण्याची मागणी होत आहे. चांगला प्रतिसाद मिळेल, राष्ट्रवादी काँग्रेसची सातारा पालिकेत सत्ता येईल, अशी आर्जव राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेऊन त्यांच्याकडे केली. त्यावर शरद पवारांनी त्यावर सातारा पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेल टाकण्यासाठी लवकरच बैठक घेऊ असा शब्द दिला आहे.
सातारा पालिकेची निवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होऊ शकतो. त्या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल टाकण्यासाठी मंगळवारी दीपक पवारांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी दीपक पवार यांनी त्यांच्याजवळ सातारा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल टाकण्याची विनंती केली. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा पालिकेत निवडणुकीत उतरला नव्हता. शहरात अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल टाका आमचा पाठींबा आहे. असे सांगत आपली भावना व्यक्त करत आहेत. आजपर्यंत दोन्ही राजेंच्या आघाडय़ा पालिकेत राहिल्या आहेत. दोन्ही राजेंच्या कामावर शहरातील नागरिक प्रचंड नाराज आहेत. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढले आहे. पॅनेल टाकावे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता येईल. पालिकेत 48 जागांची निवडणूक होणार आहे. तिन्ही पक्षाला जर जागा विभागून दिल्या तर निश्चितच सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसची येईल, असे त्यांना सांगितले. त्यावर शरद पवार यांनी त्यांना सांगितले की लवकरच या विषयावर जयंत पाटील, अजितदादा, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, तुम्ही आणि मी असे बसू, चर्चा करू आणि निर्णय घेऊ असे त्यांना आश्वासित केले. त्यामुळे येत्या काही दिवसात शरद पवार हेच सातारा पालिका निवडणुकीत लक्ष घालण्याच्या अनुषंगाने बैठक घेतील असे दीपक पवार यांनी सांगितले.
दीपक पवारांनी ठरवले तर दोन्ही राजेंना जाणार जड
मागच्या पालिका निवडणुकीवेळी दीपक पवार हे भाजपमध्ये होते. त्यांनी भाजपचे स्वतंत्र पॅनेल पालिका निवडणुकीत उतरवले. नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून सुवर्णा पाटील या होत्या. प्रचाराला त्यांनी सासरवाडीहुन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साताऱयात आणले होते. त्यामुळे दीपक पवार यांच्या त्यावेळेस भाजपच्या पॅनेलमधून सहा नगरसेवक निवडुन आले. आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेल टाकले तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदान शहरात 40 टक्केच्या आसपास झाले होते. जर दोन्ही राजेंच्या दोन आघाडय़ा झाल्या तर मागच्या पालिका निवडणुकी प्रमाणे दीपक पवार हे तिन्ही पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल उतरवून दोन्ही राजेंना निश्चितच चांगलेच घाईला आणतील अशी चर्चा आहे.