श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये सलग दुसऱया दिवशी रविवारी दहशतवाद्यांनी तीन बिहारी नागरिकांना लक्ष्य केले आहे. या तिघांवर गोळीबार करण्यात आला. यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. शनिवारीही बिहारच्या आणि उत्तर प्रदेशच्या दोन नागरिकांची हत्या करण्यात आली होती.
काश्मीर खोऱयातील कुलगामच्या तरण गंजीपोरा येथे या नागरिकांना गोळय़ा मारण्यात आल्या. ते कामगार म्हणून येथे आले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव चुनचुन रिषी देव असे असून त्याच्यावर अनंतनाग येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे राजा रिषी देव आणि जोगिंदर रिषी देव अशी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हत्यांच्या प्रमाणात वाढ
काश्मीरमध्ये बिगर काश्मिरी लोकांची हत्या होण्याचे प्रमाण गेल्या दोन आठवडय़ांमध्ये वाढले आहे. आतापर्यंत सहा बिगर काश्मिरी नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने बिहारच्या कामगार आणि फेरीवाल्यांचा समावेश आहे. नागरिकांना संरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रशासनाने प्रतिपादन केले आहे. नागरिकांच्या हत्या झाल्यानंतर केलेल्या धडक कारवाईत 900 जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून काही जणांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून प्रशासनाने आणि भारतीय सेनेने देखरेख अधिक प्रमाणात करण्याचा निर्णय घेतला आहे.